कामगारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच वळसे पाटील गेले निघून

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

Updated: Jan 25, 2020, 07:15 PM IST
कामगारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच वळसे पाटील गेले निघून title=

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : राज्य सरकारला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्हा पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पहिल्यांदाच पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत. करमाळ्यातील आदिनाथ साखर कारखान्यातील कामगारांचा पगार मागील ४० महिन्यापासून थकीत आहे. हा कारखाना देखील बंद आहे. अशातच या कारखान्यातील कर्मचारी राजेंद्र जाधव याने आर्थिक चणचण असल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

या कारखान्या संबधाने सोलापूर जिल्हा पालकमंत्री आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कारखाने बंद असल्याने कामगारांच्या  तसेच कामगारांच्या आत्महत्ये बाबत प्रश्न विचारल्यानंतर वळसे पाटील यांनी यावर काही प्रतिक्रिया न देता ते थेट उठून गेले. कामगार मंत्र्यांनाच कामगारां बद्दल अनास्था असल्याची चर्चा सुरू आहे. 

एकंदर पाहिले तर निश्चितच बंद पडलेल्या साखर कारखान्यांच्या कामगारांची अवस्था बिकट आहे. साखर कामगारांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा कामगार मंत्रांचा दृष्टिकोन सकारात्मक हवा. विशेष म्हणजे दिलीप वळसे-पाटील यांना साखर कारखानदारीचा चांगला अनुभव आहे.