'मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय; मराठा आंदोलनकाच्या आत्महत्येनंतर जरांगे पाटलांचं आवाहन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजगुरू नगरमध्ये जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजीत करण्यात आली होती. मराठा आंदोलकांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.  

आकाश नेटके | Updated: Oct 20, 2023, 02:38 PM IST
'मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय; मराठा आंदोलनकाच्या आत्महत्येनंतर जरांगे पाटलांचं आवाहन title=

Maratha Reservation : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा पेटला आहे. महिन्याभरापूर्वी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी केलेल्या बेमुदत उपोषणामुळे राज्य सरकारला मराठा आरक्षणावरुन इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टीमेटम संपत आला आहे. त्याचपार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील राज्यात विविध ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत. आता पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे यांची तोफ धडाडत आहेत. पुण्याच्या (Pune) राजगुरुनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडत आहे.

"आपल्यावर सरकारशिवाय कुणालाच अन्याय करायचा नाही. आतापर्यंत जेवढ्यांनी बलिदान दिले ते वाया जाऊ द्यायचे नाही. आतापर्यंत जेवढ्या आत्महत्या झाल्या त्याला सरकार जबाबदार आहे. आपण 29 ऑगस्ट रोजी लढा सुरु केला. आजपर्यंत तो लढा सुरु आहे. हे आंदोलन आत्तासुद्धा शांततेत सुरु आहे. आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. मी माझ्या समाजाच्या पुढे जात नाही. मराठा आरक्षण मिळवण्यात आपलीही चूक आहे. आपण मोर्चे काढले पण आरक्षण समजून घेतलं नाही. आरक्षणाच्या मुळाशी जाणं गरजेचं होतं. मराठा समाज शिक्षणाच्या मुळाशी गेला. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते रात्रीच आरक्षणात गेले. मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की समिती, कागदे वाचतात. मुंबईत सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव पारीत केला आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"मराठ्यांना दोन अंग आहेत. एक क्षत्रिय मराठा आहे. दोन मराठा शेती कसतो, घाम गाळतो आणि अन्न देतो. मग कुणबी प्रमाणपत्र मागितलं म्हणून काय झालं? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारला वेळही दिला आणि पर्यायही सुचवले. 2004 च्या जीआरनुसार मराठा आरक्षण द्या असा पर्याय सुचवला होता," असेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं.

मला मराठ्यांशी गद्दारी करायची नाही. मी मरेपर्यंत मराठा समाजांशी गद्दरी करणार नाही. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी मी उभा आहे. 24 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरणार आहे. उद्रेक करायचा नाही. उद्रेक केला तर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे आपण शांततेने आंदोलन करायचे आहे. उग्र आंदोलन करायचे नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.