'सरकारला वेळ दिला तर आरक्षण मिळणार का? सरकारने इथे येऊन बोलावं' मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणासंदर्बात सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता किती आणि कशासाटी वेळ पाहिजे असा सवाल विचारला आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 1, 2023, 02:37 PM IST
'सरकारला वेळ दिला तर आरक्षण मिळणार का?  सरकारने इथे येऊन बोलावं' मनोज जरांगे पाटील  title=

Maratha Reservation : सरकारला आता किती आणि कशासाठी वेळ पाहिजे, सरसकट मराठा समाजाला आरक्षण (Maratha) देणार का, असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला विचारला आहे.  सर्वपक्षीय बैठकीतला तपशील जाणून घेण्याची माझी इच्छा नाही, या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांना न्याय द्यायचा सोडून सरकार नुसता बैठका घेतंय, मराठा समाजाच्या लेकरांचे मुडदे पडायला लागले आहेत. तरी लक्ष देत नाहीएत, हसण्यावारी घेतलं जात आहे. हे काय जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं का.गोरगरीबीच्या लेकरांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. आरक्षण कसं देणार ते इते येऊन सांगावं, सरकारचा अध्यादेश आपल्याला मान्य नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

मी मराठा समाजासाठी लढणारा आहे दगाफटका करणारा नाही, म्हणून तुम्ही आमच्याकडून काहीही वदवून घेणार का, तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार का, तुम्हाला वेळ का वाढवून हवाय हे इथे येऊन सांगा, सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारला वेळ वाढवून द्यायचा की नाही हे समाजाशी बोलून सांगू असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना आरक्षण प्रमाणपत्र देण्याचा आदेश आम्हाला मान्य नाही, आम्हाला सरसकट आरक्षण हवं आहे. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,असंही जरांगे पाटील यांनी ठणकावलं आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस याना काड्या करायची सवय असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय.  फडणवीसांनी चर्चेला यावं त्यांना अडवणारन नाही, सरकारला मार्गच काढायचं नाहीए, आज संध्याकाळपासून पाणी सोडणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. समोरासमोर येऊन चर्चा करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊदे असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं.

संभाजीराजे छत्रपती यांची सरकारवर टीका
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केलीय.. सर्वपक्षीय बैठकीला संभाजीराजे छत्रपती उपस्थित नव्हते. मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे.  त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.असं संभाजीराजेंनी म्हटलंय.