'मनोज जरांगेंनी कट रचत पोलिसांवर हल्ला केला' छगन भुजबळांचा गंभीर आरोप

OBC Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी कट रचून पोलिसांवर हल्ला केला, असा खळबळजनक आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. तर लाठीचार्जनंतर रोहीत पवार आणि राजेश टोपे यांनी पवार येणार असल्याचं सांगून जरांगेना उपोषणाला बसवलं असा गौप्यस्फोचही भुजबळ यांनी केलाय.

राजीव कासले | Updated: Nov 17, 2023, 05:02 PM IST
'मनोज जरांगेंनी कट रचत पोलिसांवर हल्ला केला' छगन भुजबळांचा गंभीर आरोप title=

OBC Reservation : मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात जालन्यात ओबीसी नेत्यांची आरक्षण बचाव एल्गार सभा (OBC Elgar Sabha) वादळी ठरलीय. मंत्री छगन भुजबळांनी थेट जरांगेंवर टीका केली. छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal) स्वकष्टाचं खातो, सासरचे तुकडे मोडत नाही अशा शब्दात छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार सभेतून मनोज जरांगेंवर (Manoj Jarange Patil) निशाणा साधलाय. जरांगेंनी कट करून पोलिसांवर दगडफेक केल्याचा खळबळजनक आरोप छगन भुजबळांनी केला. तसंच या लाठीचार्जनंतर जरांगेंच्या भेटीला रोहित पवार आणि राजेश टोपे गेले आणि जरांगेंना उपोषणस्थळी जाऊन बसायला सांगितल्याचा आरोपही भुजबळांनी केला. 

गावबंदीचे पोस्टर फाडा, महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिला का अशी टीका करत भुजबळांनी जशास तसं उत्तर द्यावं लागेल असा इशाराही दिला आहे. तर ओबीसींच्या एल्गार सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणनेची आक्रमकपणे मागणी केलीय. जर सर्वांचीच मागणी आहे तर जातनिहाय जनगणना का केली जात नाही असा सवाल भुजबळांनी केला. 

शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
या सभेत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयीदेखील गौप्यस्फोट केला आहे. अनेकजण सांगतात की शरद पवारांनी ओबीसांना आरक्षण दिलं, पण शरद पवार यांनी फक्त मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. त्यावेळी मंडल आयोगाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचा अहवाल दिला.  देशाचे तत्कालीन पंतप्रधान व्ही पी नरसिंह राव यांनी मंडल आयोगाचा अहवाल स्विकारला. तत्कालीन पंतप्रधांनी अहवाल स्विकारल्यानंतर आम्ही सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे राज्यात अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते, तर मी आणि विलासराव देशमुख, शिवाजीराव देशमुख मंत्रीमंडळात होते. आमच्या मागणीनंतर शरद पवारांनी ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केलाय. 

गावबंदीचे पोस्टर्स फाडा
मराठा आरक्षण देत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करा असा पवित्रा मराठा समाजाने घेतलाय. यावरही छगन भुजबळ यांनी निशाणआ साधलाय. महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावरलिहून दिला आहे का, असा सवाल विचारत भुजबळांनी जशास तसं उत्रत द्यावं लागेल असा इशारा दिला आहे. पोलिसांनी गावागावातील गावबंदीचे फलक हटवलं पाहिजे, हे लोकशाहीचं राज्य आहे आणि तुम्ही पक्षपातीपणा कराल तर ओबीसीसुद्धा गप्प बसणार नाही, असा घरचा आहेरही भुजबळांनी सरकारला दिला आहे.