औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

आदिवासी एकता परिषदेसाठी वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे जळगाव जिल्ह्यच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी औरंगजेबाचे फोटो लावल्याने काय फरक पडतो असा सवाल उपस्थित केला.  

Updated: Jun 9, 2023, 07:10 PM IST
औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : अहमदनगरमध्ये (Ahamednagar) एका मिरवणुकीत औरंगजेबाचे (Aurangazeb) फोटो नाचवण्यात आल्यानं वादाची ठिणगी पेटली होती. तर कोल्हापूरमध्ये (Kolhapur) काही तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं हिंसाचार उसळला होता. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेब याच मातीतला आहे. मग त्याचे फोटो लावले किंवा छापले तर आक्षेप का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. औरंगजेब कुठून पैदा झाला, हे फडणवीसांनी सांगावं, तसंच औरंगाजेबाच्या फोटोचा इश्यू का  केला जातोय असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विचारला आहे. 

धमकीचं प्रकरण गंभीर
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी धमकी येणं ही गंभीर बाब असून हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावं अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. सत्ता येते आणि जाते मात्र सामान्य माणूस आणि नेता असुरक्षित होऊ नये याची दक्षता शासनाने घेऊन दोन्हीही नेत्यांना पोलिसांनी पूर्णपणे संरक्षण द्यावे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

विशिष्ठ जातीच्या लोकांचा उल्लेक
मुंबईतल्या मीरारोड आणि चर्चगेट इथे घडलेल्या दोन भीषण घटनांवरही प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. मीरारोडमधल्या घटनेत साने नावाच्या व्यक्तीने महिलेची निर्घृण हत्या केली. तर चर्चगेटमधल्या घटनेत कनोजिया नावाच्या आरोपीने 19 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करुन तिची हत्या केली.मुंबईतील घटनेप्रमाणे दिल्ली आणि पालघर मध्येही अशा घटना घडल्या. मात्र या घटनेत देशपांडे,भिडे नाव असल्याने त्या नावांचा उल्लेखही केला गेला नाही . पण अल्ताफ किंवा हुसेन ही नावे आली तर लगेच बाहेर येतात असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

राहुल नार्वेकर यांना टोला
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सत्तासंघर्षाच्या निर्णयाला क्रांतीकारी निर्णय संबोधणाऱ्या राहूल नार्वेकर यांच अभिनंदन करतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना टोला लगावला आहे. शिंदे गट अस्तित्वात आले तेव्हापासून शिंदे गटाचं अस्तित्व तुम्हाला मान्य करावं लागेल, तोही निर्णय सुप्रिम कोर्टाने निकालात काढून दिला, शिवसेनेचा व्हिप काढण्याचा अधिकार काढला. या निर्णयाला जर राहूल नार्वेकर क्रांतीकारी निर्णय म्हणत असतील तर नार्वेकर यांचं अभिनंदन करतो, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.