गेल्या अठरा दिवसात भाजपा, शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसला काय मिळालं ?

 इतक्या घडामोडींनंतर या पक्षांना काय मिळालं याचा हा लेखाजोखा...

Updated: Nov 13, 2019, 08:19 AM IST
गेल्या अठरा दिवसात भाजपा, शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसला काय मिळालं ? title=

मुंबई : थरारक राजकीय घडामोडींनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कोण कोणासोबत जाणार ? कोणाचा काडीमोड होणार ? या सर्व गोष्टी वेगाने बदलत राहील्या. यानंतर कोणाला काहीच मिळाले नाही, कोणच्या तोंडचा घास गेला तर कोणाला अपेक्षा नसतानाही यश मिळाले. इतक्या घडामोडींनंतर या पक्षांना काय मिळालं याचा हा लेखाजोखा...

शिवसेना : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रदर्शन समाधानकारक होते. पण पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप, अडीच वर्षे मुख्यमंत्री पद यावर अडून राहील्याने युती तुटली. शिवसेना राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाण्याच्या हालचाली करु लागली. यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला हानी पोहोचली. भाजपाच्या पाठिंब्यावर असलेल्या महानगरपालिकेतील सत्ता जाण्याचा धोका पत्करावा लागू शकतो. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. पण संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना चुकीचा सल्ला देत आहेत असे मानणारा एक गट ही शिवसेनेत आहे. 

काँग्रेस : मागच्या १८ दिवसात काँग्रेस पक्षाला काही नुकसान पोहोचले नाही. कारण हरण्यासारखा डाव त्यांनी खेळला नव्हता. त्यांनी निवडणुकीच्या आधीच हार मानली होती. पुढचे पाच वर्षे विरोधात बसण्याच्या तयारीतच काँग्रेसने निवडणूक लढली होती. पण अर्धी शक्ती लावूनही काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि ते चौथ्या नंबरावर पोहोचले. त्यामुळे शेवटच्या बॅट्समन मैदानात येतो आणि ८० धावा करतो त्याला शतक केल्याचे दु:ख नसते. अशी स्थिती सध्या काँग्रेसची आहे. 

भाजपा : आनंद, दु;ख आणि पुन्हा आनंद असा काहीसा अनुभव सध्या भाजपा घेत आहे. विधानसभा निवडणुकीत जनमत भाजपाच्या बाजुने आले पण एकहाती सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांना शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाचे वाटप करायचे नव्हते त्यामुळे शिवसेनेने त्यांच्यासाठी चर्चेची दारे बंद केली. आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस देखील सत्तास्थापने पर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे भाजपाच्या गोटात पुन्हा आनंद आहे. त्यामुळे कोणत्या एका पक्षाचा जनाधार वाढणार असेत तर तो भाजपा असेल असे राजकीय अभ्यासक सांगतात. पण समाधानकारक निकाल न देऊ शकल्याने पक्षांतर्गत फडणवीस यांचे महत्व थोडे कमी झाले आहे. पण दैव आणि मोदी-शहा ही जोडी त्यांच्या सोबत आहे तोपर्यंत त्यांना काळजी करण्याचे कारण नाही. 

एनसीपी : वाढते वय, आरोग्याच्या समस्या आणि राष्ट्रवादीची ढासळलेली स्थिती पाहता पवारांची ही शेवटची निवडणूक मानली जात होती. पण यासर्वावर लिलया मात करत त्यांनी निवडणूकीत रोमांच भरत आपल्या पार्टीला पुनरजन्म देत एनसीपी तिसऱ्या स्थानावर पोहोचली. बिगर भाजपा सरकार बनवण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र तर केले पण त्यांनंतर त्यांचे गणित विस्कटले. स्वत:च्या पक्षात पवारांचे वर्चस्व अधिक ठळक झाले. भविष्यात काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र घेऊन लढण्याचे पर्याय त्यांच्यासमोर खुले झाले.