भाजप प्रवेशावर नांदेडच्या मुस्लिम, शिख समर्थकांचं मत काय? अशोकराव चव्हाण म्हणतात, ‘नांदेड माझा मतदार संघ नाही!’

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करताच राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून अशोक चव्हाण हे दिल्लीत जाणार आहेत. मात्र त्यांच्या नांदेड जिल्ह्यात यामुळे काय परिणाम होणार याबाबत अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. 

आकाश नेटके | Updated: Feb 16, 2024, 12:23 PM IST
भाजप प्रवेशावर नांदेडच्या मुस्लिम, शिख समर्थकांचं मत काय? अशोकराव चव्हाण म्हणतात, ‘नांदेड माझा मतदार संघ नाही!’ title=

Ashok Chavan : काँग्रेसची साथ सोडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. पक्षप्रवेश करताच अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देखील मिळाली आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर भाजपा पक्ष फोडण्याचे आणि इतर पक्षांचे नेते पळवण्याचे काम करत आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती. जिथे मी राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. मी  तिच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे काम करेन. राजकारण हे एक सेवेचे माध्यम आहे. पक्ष सोडल्यानंतर काही सहकारी टीका करतात. पण मी कोणावर दोषारोप करणार नाही, अशी भूमिका अशोक चव्हाणांनी मांडली होती. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत नांदडेमधल्या राजकीय परिस्थिबाबत भाष्य केले.

नांदेड हा मतदार संघ मुस्लिमबहुल आणि शीखबहुल आहे. शीख समुदायाचे महत्त्वाचे धर्मस्थळ देखील नांदेडमध्ये आहे. इतर राज्यांमध्ये भाजपसोबत गेलेल्या नेत्यांना या वर्गाने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे या समुदायाचा जनमानस हा तुमचाही आहे असे कसे मानलं जाऊ शकते असा सवाल अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला. यावर अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं.

"माझा मतदार संघ हा नांदेश शहराशी नाही तर भोकर मतदारसंघाशी निगडित आहे. नांदेड शहरातील आणि ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी आहे. भाजपची मते फिक्स आहेत. मला माननारा लोकांची मतेही तिथे आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की भाजपची मते आणि मला व्यक्ती म्हणून माननारा जो वर्ग आहे त्याचे एकत्रीकरण केले तर भाजपला नक्कीच या निवडणुकीमध्ये यश मिळू शकतं," अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. 

काँग्रेससोबतचे दोन पिढ्यांचे नाते तोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांनी आपली विचारधारा एका रात्रीत बदलणार नसल्याचे म्हटलं आहे. 'मला माहित आहे की एखाद्याची विचारधारा एका रात्रीत बदलणे शक्य नाही. भाजपची विचारधारा मी समजून घेईन. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की मी प्रत्येक गोष्टीशी सहमत असणे आवश्यक नाही. मला त्या गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ हवा आहे. याशिवाय काळाची गरज काय आहे, हेही पाहावे लागेल. धर्मनिरपेक्षतेपेक्षा एक देश म्हणून भविष्यासाठी आपण कसे तयार आहोत हे महत्त्वाचे आहे,' असेही अशोक चव्हाण म्हणाले.