Maharashtra Political Crisis : 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे - फडणवीस सरकार स्थिर; जाणून घ्या संख्याबळाचे गणित

Maharashtra Political Crisis : राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे. दुसरीकडे जर निकालानंतर 16 आमदार अपात्र ठरले तर सरकारचं भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात आहे. 

आकाश नेटके | Updated: May 11, 2023, 09:02 AM IST
Maharashtra Political Crisis : 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे - फडणवीस सरकार स्थिर; जाणून घ्या संख्याबळाचे गणित title=

Maharashtra Political Crisis : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज निकाल देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसह सत्तासंघर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींवरील घटनात्मक वैधतेवर सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjay Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ या प्रकरणावर महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार जर अपात्र ठरले तर शिंदे सरकार (Shinde Governmernt) पडणार की राहणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालाय. पण या निर्णयाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही असंच दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरले तरी राज्यातील भाजपच्या पाठिंब्यावरील सरकार कोसळण्याची शक्यता नाही. राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या ही 288 आहे तर 16 आमदार अपात्र ठरले तरी हे संख्याबळ 272 होणार आहे. अपात्रतेच्या निकालानंतर सरकार टिकवण्यासाठी 272 आमदारांच्या संख्येनुसार बहुमताची आवश्यकता असेल. सध्या शिंदे फडणवीस सरकारकडे 164 आमदारांचे संख्याबळ आहे. 16 आमदार अपात्र ठरले तर हे संख्याबळ 148 इतके असणार आहे. त्यामुळे बहुमतानुसार सरकार कोसळण्याची शक्यता नाहीये.

आमदारकी गेल्यावर एकनाश शिंदे मुख्यमंत्री पदी कायम राहणार का?

सुप्रीम कोर्टाने जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले तर ते मुख्यमंत्री पदी कायम राहणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. मात्र या निकालाचा मुख्यमंत्री पदावर युतीच्या संख्याबळामुळे परिणाम होण्याची शक्यता नाही. जर एकनाथ शिंदे अपात्र ठरवले गेले तर कायद्यानुसार विधिमंडळाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेता येते. पण त्या व्यक्तीला सहा महिन्याच्या आत विधान परिषद किंवा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून यावं लागतं. त्यामुळे 16 आमदारांचं निलंबन केलं तरी एकनाथ शिंदे पुढचे सहा महिने मुख्यमंत्री म्हणून कायम राहू शकतील.

कोण आहेत ते 16 आमदार?

1) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार 
3) तानाजी सावंत
4) यामिनी जाधव
5) संदिपान भुमरे 
6) भरत गोगावले
7) संजय शिरसाट
8) लता सोनावणे
9) प्रकाश सुर्वे
10) बालाजी किणीकर
11) बालाजी कल्याणकर
12) अनिल बाबर
13) संजय रायमूलकर
14) रमेश बोरनारे
15) चिमणराव पाटील
16) महेश शिंदे