'सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट...'; मविआच्या पराभवाचं मनसेकडून 'विश्लेषण'

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: 11 पैकी 9 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचे दोन आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार जिंकला. मात्र शरद पवारांनी पाठिंबा दिलेला उमेदवार पडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 13, 2024, 11:09 AM IST
'सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट...'; मविआच्या पराभवाचं मनसेकडून 'विश्लेषण' title=
विधान परिषदेच्या निकालानंतर नोंदवलं मत

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिसरी जागा लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय अंगलट आल्याचं चित्र शुक्रवारी विधानसभेमध्ये पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठींब्यावर उभे राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला असून महायुतीचे 9 उमेदवार निवडून आले आहेत. या पराभवामुळे काँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. मात्र या पराभावामुळे पुन्हा एकदा महाविकासआघाडीमधील धुसपूस समोर आली आहे. असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शरद पवारांना जयंत पाटलांच्या पराभवावरुन टोला लगावला आहे. 

जयंत पाटलांबरोबर झालं काय?

जयंत पाटील यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या 12 आमदारांची मतं मिळतील असं अपेक्षित होतं. घडलंही त्याप्रमाणेच त्यांना 12 मतं मिळाली. मात्र त्याचबरोबर इतर मित्रपक्षांकडून त्यांना मतदान होईल असं मानलं जात असताना एकही अतिरिक्त मत त्यांना मिळालं नाही. जयंत पाटलांना काँग्रेसच्या मदतीची अपेक्षा होता. दोन ते तीन अतिरिक्त मतं आपल्याला काँग्रेसकडून मिळावीत असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र काँग्रेसकडून अतिरिक्त मतं ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना पडली. काँग्रेसने तसं आधीच जाहीर केलं होतं. 

नक्की वाचा >> धक्कादायक! मुलाच्या साखरपुड्यासाठी राज्यपालांनी वापरला राज्य सरकारचा पैसा; थेट PMO कडे तक्रार

त्या एका वक्तव्यामुळे पराभव?

काँग्रेसने नार्वेकरांना मतदान करणार हे निश्चित झाल्यानंतर निवडणुकीच्या आधल्या दिवशी जयंत पाटलांनी काँग्रेसची 3 ते 4 मतं फुटतील असं म्हटलं होतं. जयंत पाटील याचं हेच विधान त्यांच्या अंगाशी आलं आणि त्यांना एकही अथिरिक्त मत मिळालं नाही. खरं तर शरद पवारांच्या 12 आमदारांबरोबरच शेतकरी कामगार पक्षाच्या एका आमदारचं, हिंतेद्र ठाकूर यांची 3 मतं, समाजवादी आणि एमआयएमची प्रत्येकी 2 मतं असा अगदी कट-टू-कट हिशोब जयंत पाटील यांच्या मतांसाठी लावण्यात आला होता. मात्र त्यांना 12 मतं पडली आणि त्यांचा पराभव झाला.

नक्की वाचा >> 'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला

शरद पवारांना मनसेचा टोला

शरद पवारांनी पाठिंबा दिलेला उमेदवार पडल्याच्या मुद्द्यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवारांना टोला लगावला. प्रसारमाध्यमांशी बोलताना देशपांडेंना पवारांनी पाठींबा दिलेला उमेदवार पडल्यासंदर्भात विचारण्यात आलं. "महाविकास आघाडीचे जे तीन उमेदवार होते त्यापैकी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे शरद पवार कुठेतरी रणनिती आखण्यात कमी पडले असं वाटतं का?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडेंनी, "मला वाटतं सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केला, असं निकालावरुन दिसत आहे," अशी खोचक प्रतिक्रिया नोंदवली.