कमी चाचण्यांमुळेच संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण अधिक, फडणवीसांचा आरोप

कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढतोय

Updated: Jul 21, 2020, 09:16 PM IST
कमी चाचण्यांमुळेच संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण अधिक, फडणवीसांचा आरोप title=

मुंबई : कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलायं. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात ८३६९ नवे रूग्ण वाढले तर २४६ जणांचा मृत्यू झालायं. कोरोना चाचण्या, त्यातून येणारे पॉझिटिव्ह रूग्ण, दैनंदिन संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा आलेख त्यांनी मांडलाय. 

महाराष्ट्रातील संसर्गाचा दर सुरुवातीला ६ ते ७ टक्के होता. हा दर ८ जूनपर्यंत १७ ते १८ टक्क्यांवर आला आणि आता २३ ते २४ टक्के आहे. याचा अर्थ १०० चाचण्यांमधून २४ जणांना कोरोनाचे निदान होत असल्याचे फडणवीसांनी सांगितले. मुंबईचा संसर्गाचा दर सातत्याने २१ ते २७ टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. 

१ ते १९ जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ ५५०० चाचण्या दररोज होतायत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच राहत असल्याचे ते म्हणाले. अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा हाच या सर्वामागचा उपाय असल्याचे फडणवीस म्हणाले. 

सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६,४०,६४४ चाचण्यांपैकी ३,२७,०३१ (१९.९३ टक्के) नमने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ७,७९,६७६ व्यक्ती होम क्वारंटाईन असून ४५,०७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

रायगडमध्ये आज दिवसभरात तब्बल 299 नवीन रुग्ण वाढले. जळगावात आज दिवसभरात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून जळगाव जिल्ह्यात 183 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. परभणीत आज कोरोनाचे 26 नवे रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात सकाळ पासून 54 नवीन रूग्ण आढळले आहेत.

वसई-विरार मध्ये दिवसभरात १६९ नवे रुग्ण आढळले आहेत.आज दिवसभरात उल्हासनगर- 100, बदलापूर- 58, अंबरनाथ- 39 नवे रुग्ण आढळले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाचे 187 नवे रुग्ण वाढले आहेत. नवी मुंबईत आज 254 रुग्ण वाढले आढळले. तर कल्याण-डोंबिवलीत क्षेत्रात आज 268 रुग्णांची नोंद झाली आहे.