राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती, हवामान विभागाकडून विदर्भात ऑरेंट अलर्ट

Updated: Jul 19, 2022, 08:50 AM IST
राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा title=

मुंबई : राज्यात आजही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावासाचा इशारा देण्यात आला आहे. 

औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पवासाचा इशारा देण्यात आला आहे. 

विदर्भात आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अकोला, अमरावतीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातल्या 7 जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसामुळे वणा नदी तसेच भाकरा नाल्याला पूर आला आहे. 700हून अधिक घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे या भागात SDRFनं युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु केलं आहे. 

यवतमाळच्या बाभूळगावात पुरामुळे 2 व्यक्ती झाडावर अडकून पडले. बेंबळा धरणाचे 20 दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा प्रवाह लगतच्या शेतांत शिरला. 

पाणी वाढल्यानं हे दोघेही झाडावर दुपारपासून अडकून पडले.त्यांच्या सुटकेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक बेंबळा प्रकल्पावर पोहचून त्यांची सुखरुप सुटका केली आहे.