Savarkar Issue: "दुसरा गोडसे देशाला..."; सावरकर वक्तव्य प्रकरणावरुन आनंद दवेंची राहुल गांधींना धमकी?

Anant Dave Warning To Rahul Gandhi: राहुल गांधींवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना हिंदू महासंघाचे अनंत दवे यांनी थेट इशारा दिला आहे. राहुल गांधींनी इंदिरा गांधीचा इतिहास वाचला असता तरी सावरकरांबद्दल मुर्खपणाची विधानं केली नसती असंही अनंत दवे म्हणाले.

Updated: Mar 28, 2023, 01:51 PM IST
Savarkar Issue: "दुसरा गोडसे देशाला..."; सावरकर वक्तव्य प्रकरणावरुन आनंद दवेंची राहुल गांधींना धमकी? title=
Anand Dave Rahul Gandhi

Anand Dave Warning To Rahul Gandhi: हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना इशारा देताना दुसरा गोडसे देशाला परवडणार नाही असं विधान केलं आहे. पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंशी बोलत असताना राहुल गांधी सातत्याने वीर सावरकरांना लक्ष्य करत असून असेच सुरु राहिले तर आम्ही सुद्धा महात्मा गांधींची 100 पापं, हिंदूंचा नसरंहार यासारख्या गोष्टींचा इतिहास बाहेर काढू असं दवे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी हिंदू-मुस्लिम दंगलीचा आपला 1000 वर्षांचा इतिहास असून असं काही घडणार नाही याची काळजी सर्वांनीच घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

गांधींची 100 पापं, इंदिरा गांधींचा इतिहास...

दवे यांनी राहुल गांधींवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना त्यांनी इंदिरा गांधींचा इतिहास वाचला असता तरी सावरकरांबद्दल अशी मूर्खपणाची वक्तव्य केली नसती असं म्हटलं आहे. "गेली अनेक वर्ष राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करण्याचा त्यांना बदनाम करण्याचा एककल्ली कार्यक्रम राबवत आहेत. वीर सावरकरांना नावं ठेवली की प्रसिद्धी मिळते हे कळण्याइतका सुज्ञपणा राहुल गांधींमध्ये आलेला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी अर्धा तास जी बडबड केली त्यातला हायलाइट झाला तो मुद्दा म्हणजे त्यांनी सावरकरांबद्दल केलेलं विधान. आजपर्यंत आम्ही सुद्धा प्रतिष्ठा, मानसन्मान ठेऊन होतो गांधींबद्दल पण आज तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, प्रत्येकवेळेस सावकरांना टार्गेट करणार असाल तर आम्ही पण महात्मा गांधींची 100 पापं, फाळणीचा इतिहास, हिंदूंचा झालेला नरसंहार सगळ्याचा इतिहास काढण्यात येईल. पुस्तकं छापण्यात येतील. आम्ही ती पुस्तकं छापलेली आहे. राहुल गांधींनी इंदिरा गांधीचा जरी इतिहास अभ्यासला असता तर त्यांनी सावरकर प्रतिष्ठानसाठी दिलेली देणगी, त्यांनी केलेलं सावरकरांचा उल्लेख. भारतमातेचा सुपूत्र. मोहनदास गांधी यांनी सावरकरांच्या बंधूंना एक पत्र लिहिलेलं होतं. सावरकरांचा लढा हा पूर्णपणे राजकीय असून मोहनदास गांधी पूर्णपणे खंबीरपणे सावरकरांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी याचा अभ्यास केला असता तर अशी मुर्खपणाची वक्तव्य त्यांनी केली नसती," असं दवे म्हणाले.

दुसरा गोडसे परवडणार नाही; धमकी की इशारा?

"सावरकर आंदमानमध्ये जिथे राहिले होते तिथली तिकीटं त्यांना पाठवली आहेत. आम्ही आमच्या खर्चाने त्यांची येण्याजाण्याची, राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी दिवसातील काही तास तरी त्या कोठडीत काढावेत. त्यांना सावरकर कळतील. त्यांनी सावरकर वाचण्याची, अभ्यासण्याची अपेक्षाच नाही. सावरकर अनुभवावेत तरी नाहीतर हिंदू महासंघ अधिक आक्रमक होईल. या देशाला दुसरा गोडसे परवडणारा नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे असं आमचं राहुल गांधींना म्हणणं आहे," असं दवे यांनी यावेळेस म्हटलं. त्यावर पत्रकारांनी, "तुम्ही धमकी देताय की इशारा देताय?" असा प्रश्न दवेंना विचारला. त्यावर उत्तर देताना दवेंनी, " आम्ही त्यांना विनंती करत आहोत. गांधीजी होते म्हणून गोडसे झाले. तशापद्धतीचं परत काही घडू नये. सारखं सारखं कोणत्याही राजकीय पक्षाला, त्यांच्या उद्दीष्टाला टार्गेट करणं योग्य नाही. 
प्रत्येक पक्षाने ज्याची त्याची जबाबदारी समजली पाहिजे अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे," असं दवे म्हणाले.

भूमिका पटत नसेल तर...

दुसरा गोडसे परवडणार नाही म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दवे यांनी, "आम्ही असं म्हणतोय की गोडसेनंतर जे काही झालं ते जगजाहीर आहे. अशाप्रकारचा विध्वंस या देशाला परवडणारा नाही. होऊ शकतं असं नाही पण नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाने काळजी घेणं आवश्यक आहे. बोलताना राजकीय नेत्यांनी वैचारिक भूमिका पटत नसली तर राजकीय पक्षांना किंवा श्रद्धास्थानांना टार्गेट करणं योग्य नाही हे आम्हाला म्हणायचं आहे," अशी भूमिका मांडली.

हिंदू-मुस्लिम दंगलीचा उल्लेख

विध्वंस परवडणार नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? असं पत्रकारांनी दवे यांना विचारलं. त्यावर उत्तर देताना, "काहीही होऊ शकतं. या देशात गेल्या हजार वर्षांपासून हिंदू-मुस्लिम दंगे सुरु आहेत. ते कोणा एका व्यक्तीमुळे होत नाहीत. आता ते परवडणार नाही असं आमचं म्हणणं आहे. आता आपण 700-800 वर्षांचा इतिहास मागे ठेवला पाहिजे. आता आपण विकासाच्या, प्रगतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. तसं न करता हिंदू देवी-देवतांना, श्रद्धास्थानांना टार्गेट करुन काहीही मिळणार नाही, अशी आमची भूमिका आहे," असं दवेंनी सांगितलं.