तुम्ही ताज्या समजून घेत असलेल्या भाज्या केमिकल वापरलेल्या तर नाहीत?

ताज्या ताज्या हिरव्या भाज्या खाताय, सावधान! भाज्या ताज्या करण्यासाठी केमिकलचा वापर, काय आहे या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Updated: Jul 26, 2021, 06:37 PM IST
तुम्ही ताज्या समजून घेत असलेल्या भाज्या केमिकल वापरलेल्या तर नाहीत? title=

योगेश खरे झी मीडिया नाशिक: आपण बाजारपेठेतून ताज्या समजून भाज्या आणतो आणि चवीनं खातो मात्र बऱ्याचदा आपल्याला या भाज्या ताज्या करणाऱ्यांसाठी केमिकल वापरलं असावं हे ध्यानी मनीच नसतं. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ फिरत आहे. या व्हिडीओमध्ये भाज्या ताज्या करण्यासाठी केमिकलचा कसा वापर होतो हे त्यात दाखवण्यात आलं आहे.  

तुम्ही जर हिरव्या पालेभाज्या ताज्या आणि सकस समजून खात असाल तर सावध राहा. कारण या भाज्या कशाप्रकारे ताज्या केल्या जातात त्याचा एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय. या व्हिडिओत केमिलचा वापर करू भाज्या ताज्या केल्या असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ताज्या भाज्यांबाबत अनेक सवाल उपस्थित झालेत. 

बाजारात मिळणाऱ्या हिरव्या पालेभाज्या ताज्या आणि सकस असल्याचं समजून आपण खरेदी करतो. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल.या केमिकलयुक्त पाण्यात शिळ्या भाज्या टाकल्यानंतर त्या कशा ताज्या होतात. 

नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड सिन्नर परिसरात तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. भाज्या ताज्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं हे केमिकल बिहारमधल्या एक कंपनीनं बनवलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं झी 24 तासनं या व्हिडिओची पडताळणी केली. आमचे प्रतिनिधी अन्न आणि औषध नियंत्रण अधिका-यांना भेटले. 

व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर कृषी विभागानंही केमिकलचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत. तर वैद्यकीय तज्ज्ञांही केमिकलयुक्त भाज्या खाण्यापेक्षा सेंद्रीय भाजीपाला आणि घरच्या घरी पिकवलेला भाजीपाला खाण्याचा सल्ला दिला आहे. 

खरं अशी औषधं पिकांच्या आणि उत्पादन वाढीसाठी वापरली जातात. मात्र आता त्यांचा वापर शिळ्या भाज्या ताज्या करण्यासाठी होतोय. हे शरीरासाठी निश्चितच घातक आहे. अशा केमिकलयुक्त भाज्यांनी जीवही जाऊ शकतो. आमच्या पडताळणीत ताज्या भाज्यांसाठी केमिकलचा वापर होत असल्याचा दावा सत्य ठरला आहे. 

त्यामुळे तुम्ही सावध राहा. ताज्या भाजीच्या मोहात स्वत:चं आरोग्य धोक्यात घालू नका. याशिवाय भाज्या घेतल्यानंतरही त्या स्वच्छ धुवून घ्या ज्यामुळे ह्या केमिकलचा धोका कमी होऊ शकेल आणि शक्यतो सेंद्रीय भाज्यांना प्राधान्य द्या. ज्यांना शक्य आहे ते हा उपाय नक्कीच करू शकतात असं आवाहन झी 24 तास करत आहे.