शिवरायांविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर राज्यपालांचं लांबलचक पत्र; घरातून बाहेर न पडणाऱ्या 'महनीयां'वर निशाणा

Governor Bhagat Singh Koshyari : महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही!; राज्यपालांचे गृहमंत्र्यांना पत्र

Updated: Dec 12, 2022, 11:34 AM IST
शिवरायांविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर राज्यपालांचं लांबलचक पत्र; घरातून बाहेर न पडणाऱ्या 'महनीयां'वर निशाणा title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Politics : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा ज्युना काळातील आदर्श असा उल्लेख केल्याने राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलं आहे. राज्यपालांना परत पाठवा अशी मागणी सातत्याने राज्यभरातून केली जातेय. तसेच राज्यपालांविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील करण्यात आली आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. त्यानंतर आता राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहीत आपल्या विधानाचा खुलासा केला आहे. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

राज्यपालांनी पत्रात काय म्हटलंय?

"माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेत. पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात.  याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो. आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. येथे कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही," असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत 

"आता जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, ते केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत. कोरोनाच्या काळात, जेथे अनेक ‘महनीय’ आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले.  छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्‍या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या 30 वर्षांत त्याठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गाने नाही, तर मोटारीने गेलो. माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत," असेही राज्यपालांनी म्हटलं आहे.

governor letter

 क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करीत नाही

"आदरणीय अमितजी, आपण जाणताच की, 2016 मध्ये जेव्हा आपण हलदानी येथे होतात, तेव्हाच 2019 पासून कोणतीही निवडणूक लढणार नाही किंवा राजकीय पदांपासून दूर राहीन, अशी माझी इच्छा प्रदर्शित केली होती. परंतु माननीय पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह आणि विश्वास पाहून मी महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे राज्यपालपद स्वीकारले. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर तत्काळ खेद व्यक्त करणे किंवा क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करीत नाही. मुगल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही," असेही राज्यपाल म्हणाले.