गृहिणींची फोडणी महागली; लसणाचे दर कडाडले, एक किलोसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे

Garlic Price Hike In Maharashtra: महाराष्ट्रात लसणाच्या किंमतीत वाढ झाल्याचे वृत्त आहे. आवक घटल्याने लसणाच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 11, 2023, 01:28 PM IST
गृहिणींची फोडणी महागली; लसणाचे दर कडाडले, एक किलोसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे title=
Garlic Price Hike now gets costlier prices hit Rs 400 Per kg navi mumbai

Garlic Price Hike: कांदा आणि टॉमेटोचे दर आवाक्यात आल्यानंतर आता लसणाची दर कडाडले आहेत. स्वयंपाकघरात नेहमी वापरात असणारा आणि अविभाज्य घटक असलेला लसूण वापरताना मात्र गृहिणींना आता हात आखडता घ्यावा लागणार आहे. कारण लसणाची फोडणी महागणार आहे. (Garlic Price Hike In Maharashtra)

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाची आवक ही कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे लसणाच्या दारात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळतेय. घाऊक बाजारात एक किलो लसनासाठी 250 ते 300 रुपयांचा भाव मिळत आहे. तर किरकोळ मार्केट मध्ये मात्र लसणाचा दर 360 ते 400 रुपये प्रतिकिलो वर गेला आहे. 

यंदा लसणाची लागवड कमी झाली आहे. परिणामी लसणाचे उत्पादनदेखील कमी झाले असून आवक कमी झाली आहे. नवीन लसूण मार्केट मध्ये येण्यासाठी अजून दोन ते तीन महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळं  आता थेट नवीन वर्षातच लसणाची आवक वाढणार आहे.  तेव्हा लसणाचे भाव कमी होतील, यामुळे भाजीमध्ये वापरण्यात येणारी लसणाची फोडणी महागल्याने गृहिणींचं बजेट मात्र कोलमडले आहे. 

महाराष्ट्रातील मुंबईचे व्यापारी गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानातून लसूण आयात करत आहेत. वाहतुकीचा खर्च व इतर खर्चा वाढल्यामुळं त्याचा परिणाम लसणाच्या दरावर झाला आहे. बाजारात आधीपेक्षा लसणाची आवक कमी झाली आहे. पहिले दररोज 25 ते 30 ट्रक भरुन लसूण येत होते. मात्र आता फक्त 15 ते 20 वाहन भरुन लसूण येत आहेत. दक्षिणेकडील राज्यात लसणाची आवक जवळपास बंदच झाली आहे. एपीएमसी व्यापाऱ्याच्या मते, उटी आणि मालापुरममध्ये लसणाची आवक मोठ्याप्रमाणात घटली आहे. यामुळं महागाईतही वाढ झाली आहे. 

लसणाचे दर वाढण्याची कारणे 

लसणाच्या दरात वाढ होण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे  मान्सूनच्या काळात चांगला पाऊस झाला नाही. ज्यामुळं लसणाचे पिक कमी झाले. तर, दुसरीकडे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळं काही ठिकाणांवरील लसणाचे पिक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळं आवक घटल्याने किंमत वाढली आहे.