"महाराष्ट्राला मोठा फायदा होणार"; अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत ही बैठक पार पडली

Updated: Nov 25, 2022, 02:20 PM IST
"महाराष्ट्राला मोठा फायदा होणार"; अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया title=

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सध्या दिल्लीत (Delhi) आहेत. यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांची बैठक दिल्लीत पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत ही बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना या बैठकीचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार असे म्हटले आहे.

"पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणासाठी कुठलीही बॅंक कर्ज देत नाही. त्यासंदर्भात भारत सरकारने योजना आणावी अशी मागणी मी केली आहे. कालच आपल्याला दोन हजार कोटी जीएसटी केंद्राकडून देण्यात आला आहे. केवळ आता ऑडिटचे 12 ते 13 हजार कोटी मिळायचे बाकी आहेत. पूरक पोषणाचे दूर खूपच कमी असल्याने ते वाढवण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत एनडीआरफचे जे नियम आहेत ते बदलण्याची मागणी देखील केली आहे. या बैठकीचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. अर्थमंत्र्यांनी आम्ही सांगितलेल्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करणार आहोत असे सांगितले," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याबाबतही भाष्य केले. मुख्यमंत्री कामाख्या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आणि त्यांना आशीर्वाद मिळाला आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.