कर्जमाफी जाहीर केल्यानंतर वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या

 शेतकरी कर्जमाफी योजनेस 28 जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं 

Updated: Jun 29, 2018, 11:05 AM IST
कर्जमाफी जाहीर केल्यानंतर वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या title=

मुंबई : राज्यातील भाजपा - शिवसेनेच्या युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेस 28 जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप या कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नाही.  28 जून 2017 रोजी राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करताना या कर्जमाफीचा लाभ राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे जाहीर केले होते.

सर्वात मोठी कर्जमाफी ?

 ही आतापर्यंतची सर्वात मोठी 34 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तशा जाहीरातीही सरकारने दिल्या होत्या. मात्र  वर्षभरानंतर राज्यातील 36 लाख शेतकऱ्यांना 14 हजार कोटींची कर्जमाफी मिळाली आहे.

आत्महत्या वाढल्या 

 विविध कारणांमुळे अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती, मात्र त्याचा परिणाम दिसून येत नाही. कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे.