लग्नावरही कोरोनाचं सावट, कमी लोकांत उरकणार लग्न

सरकारच्या निर्णयाला स्थानिकांचा पाठिंबा 

Updated: Mar 16, 2020, 02:15 PM IST
लग्नावरही कोरोनाचं सावट, कमी लोकांत उरकणार लग्न  title=

कोल्हापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्रातही कोरोनो व्हायरस सदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. त्या पार्श्वभूमीवर मोठे कार्यक्रम; मॉल्स; थिएटर; शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. कोल्हापूर जिल्हा प्रशासनानेही मोठे कार्यक्रम आणि लग्न समारंभाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अनेकांच्या लग्नामध्ये विघ्न आलं आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापुर जिल्ह्यातील वाघवे इथल्या ऋतुजा संजय शेलार यांच्या कुटुंबियानी  १० ते १२  लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

१८ मार्च २०२० रोजी ऋतुजा आणि किरण यांच लग्न होणार आहे. या लग्नाला अनेकांना आमंत्रित केलं होतं. पण कोरोनामुळे आता हे लग्न फक्त १० ते १२ जवळच्या व्यक्तींच्या उपस्थित होणार आहे. कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा महत्वाचा आहे. त्यामुळे कोणतेही आडेवेढे न घेता स्थानिकांनी आपली लग्न पुढे ढकलली आहे. पण ऋतुजाचं लग्न अवघ्या दोन दिवसांवर आलं आहे. लग्नाची सगळी तयारी झाली आहे. अशात लग्न पुढे ढकलण्यापेक्षा हे कमी लोकांमध्ये हुरकून घेणं योग्य ठरेल. 

'प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की, तिच्या लग्नाच्या शुभ प्रसंगी अनेकांचे आशिर्वाद मिळावेत. माझीपण तशीच इच्छा आहे. पण आता कोरोना व्हायरसमुळे हे शक्य नाही. त्यामुळे मी माझं लग्न अवघ्या १० ते १२ जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत करून घेणार आहे. त्यानंतर सगळी व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर एक रिसेप्शन ठेवू, असं होणारी नववधु ऋतुजा सांगते.'