कोरोना : मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे.  

Updated: Jul 14, 2020, 08:30 AM IST
कोरोना : मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. त्यामुळ कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या राज्यात केवळ दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या ११० वर पोहोचली आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारणार आहोत, असेल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

जालना जिल्ह्यातील कोव्हीड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-पद्धतीने उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड आदी उपस्थित होते.

खरोखरच जालना शहरात आधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या  माध्यमातून नागरिकांना कोरोना विषाणूची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून आपला देश व आपले राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची  तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही  मुख्यंत्री ठाकरे यांनी यावेळी केली.

येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणेसह आपणा सर्वांसमोर कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष व सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगत  या लढ्यात आरोग्य, पोलीस, महसुल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर लढत असून या सर्वांचे कार्य कौस्तुकास्पद व अभिनंदनीय असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात  उभारण्यात आलेल्या बी.एस.एल.-३ या आधुनिक पद्धतीच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या करुन रुग्णांवर योग्य ते उपचार केले जाणार आहेत.   आधुनिक व सुसज्ज अशा या प्रयोगशाळेत बुरशी, विषाणू, जीवंत राहू शकणार नाही अशा पद्धतीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

कोव्हिड बरोबरच या प्रयोगशाळेत अनुवंशिकते संबंधी, एचआयव्ही, साथीचे आजार यासह अन्य तपासण्या केल्या जातील. या प्रयोगशाळेच्या  माध्यमातून आपणांस  दररोज लवकरात लवकर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्या निकट सहवासितांची ओळख होईल व त्यांच्या देखील तपासण्या करुन कोरोनाची साखळी तोडण्याबरोबरच कोविड बाधितांवर  तातडीने उपचार करणे सोयीचे होणार आहे तसेच प्लाझ्मा थेरपी व ॲन्टीबॉडी टेस्टिंग मशिन लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी सांगितले.