...तर औरंगाबादमध्ये पूर्ण संचारबंदी अटळ, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

वाळूज औद्योगिक वसाहतीत 4 तारखे पासून 12 जुलै पर्यंत पूर्ण संचारबंदी 

Updated: Jun 29, 2020, 05:27 PM IST
...तर औरंगाबादमध्ये पूर्ण संचारबंदी अटळ, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा title=

औरंगाबाद : आज औरंगाबाद पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेतली. औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे जर लोकांनी सहकार्य केलं नाही तर 10 तारखेनंतर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.

त्यांनी म्हटलं की, 'औरंगाबाद शहरात दुकानं पुढील महिनाभर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात येणं-जाणं बंद राहणार असून महापालिका हद्दीत यायला पोलीस परवानगी घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद जवळच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत 4 तारखे पासून 12 जुलै पर्यंत पूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. फक्त दूध आणि औषधंच मिळणार आहे.'

औरंगाबादमध्ये रुग्ण वाढत असल्याने नागरिकांसाठी संचार बंदी लागू करण्यात येईल. उद्योगांनी सुद्धा कमीत कमी काम करावे असे आवाहन करण्यात आलं. शहरातून वाळूजला जाणं आणि तिकडून शहरात येता येणार नाही. औरंगाबाद शहरात काही दिवस जनजागृती करू, मात्र लोकांची मदत मिळाली नाही तर औरंगाबाद मध्ये पूर्ण संचारबंदी लावावी लागेल. असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.