हे शेतकऱ्यांचं सरकार, मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या 10 वारसांना मदत जाहीर 

Updated: Oct 19, 2020, 02:57 PM IST
 हे शेतकऱ्यांचं सरकार, मुख्यमंत्र्यांनी दिला धीर title=

सोलापूर : 'शेतकरी उध्वस्त झालाय, त्याला धीर द्यायला आम्ही आलोय. अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत.  हे सरकार शेतकऱ्यांच आहे', असं म्हणतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.  राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सोलापूर येथे पूर परिस्थितीच्या आढावा घेतला. या ठिकाणी बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनो काळजी करू नका, हे आपलं सरकार आहे, असं म्हणतं मोठा आधार दिला आहे. आम्ही फक्त घोषणा करणार नाही, मदतही लवकर करणार. सगळीकडे केलीये इथेही करणार असा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळा दिला. 

मला ही परिस्थिती रोज अवगत होत होती, नुकसान पाऊस याची माहिती यंत्रणा देत होती,  मी आज उद्या परवा रोज आता फिरणार आहे. पाऊस अजूनही सुरू आहे, अतीवृष्टी अजूनही होऊ शकते, इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. 

पंचनामे सुरू आहेत, प्रत्यक्ष मदत आम्ही करणारच . कुणीही काळजी करू नका, असा शब्द यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्य मदत करणार आणि केंद्राकडे मागितले तर वाईट काय? आम्ही घाईत निष्कर्ष काढत नाही, मात्र पूर्ण माहिती घेतोय, असं ही ते यावेळी म्हणाले.   पंतप्रधान यांनी मला कॉल करून माहिती घेतली आहे ते आपल्याला मदत करतील, आम्ही हक्काने मागू, असंही यावेळी ते म्हणाले. 

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या 10 वारसांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 4 लाखांची मदत यावेळी केली.  आढावा घेतला, मदत करू, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, मला राजकारण करायचे नाही, कुणीही करू नये, शेतकरी संकटात आहे त्याला मदत करणे आपलं काम आहे, आढावा यंत्रणेकडून घेणे सुरु असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.