Sambhaji Raje : संभाजीराजे छत्रपती थोडक्यात बचावले; शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर छताला...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला धुळ्यात संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) एका कार्यक्रमाला उपस्थित होते. सभा मंडपात शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर संभाजीराजे माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी मंडपाच्या वरच्या बाजूला आग लागली. 

Updated: Feb 18, 2023, 09:28 PM IST
Sambhaji Raje : संभाजीराजे छत्रपती थोडक्यात बचावले; शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर छताला... title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) विचित्र अपघाततून थोडक्यात बचावले आहेत (freak accident at Dhule). धुळ्यात शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर छताला आग लागली आणि ही दुर्घटना घडली.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला धुळ्यात संभाजीराजे छत्रपती एका कार्यक्रमाला उपस्थित होते. सभा मंडपात शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर संभाजीराजे माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी मंडपाच्या वरच्या बाजूला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. सुदैवाने ही आग लगेचच विझवण्यात यश आलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

गड किल्ल्यांचे संवर्धन केव्हा करणार? छत्रपती संभाजी राजेंचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्याचा इतिहास सांगणारे गडकोट किल्ल्यांच संवर्धन केव्हा करणार? असा थेट सवाल सरकारला विचारला आहे. धुळ्यात गल्ली क्रमांक सहा मध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजी राजे यांच्या जाहीर कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला होत. यावेळेस त्यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे हे उद्घाटन केलं.

उद्घाटन प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा संवर्धन होत नसल्याबाबत खंत व्यक्त केली.  या सर्व गड किल्ल्यांच संवर्धन झालं पाहिजे जेणेकरून शिवाजी महाराजांचा इतिहास हा जिवंत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळेस त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर ही भाष्य केले. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे ज्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळालेला आहे. याबद्दल देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

कोणाला काय चिन्ह मिळाले याचे लोकांना काही घेणे देणे नाहीन जनतेला विकास पाहिजे. गेली अडीच वर्ष अस्थिर सरकार होते. त्यामुळे विकास रखडला, आता नव्या सरकारने विकास कामे करून दाखवावीत असे आवाहन त्यांनी केले.