Maharashtra farmer : रासायनिक खत खरेदी करताना सांगावी लागतेय जात; शेतकरी आक्रमक

Maharashtra farmer : शेतमाल मातीमोल दराने विकावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत. दुसरीकडे नुकसान भरपाईबाबत सरकारकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विविध अडचणी असताना आता खत खरेदी करताना जात सांगावी लागते असल्याने शेतकरी संतापले आहेत. 

Updated: Mar 9, 2023, 07:11 PM IST
Maharashtra farmer : रासायनिक खत खरेदी करताना सांगावी लागतेय जात; शेतकरी आक्रमक title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली: अवकाळी पावासामुळे  शेकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे (Maharashtra Farmer). तर, दुसरीकडे शेतमाल मातीमोल दरानं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 10 पोती कांदे विकल्यावर सोलापूरमधील शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक मिळाला. तर,  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात (Shirol taluka of Kolhapur district) वांग्याला 27 पैसे किलोचा दर मिळाला. शेतमालाच्या दराची एक प्रकारे थट्टा सुरु आहे. त्यातच आता रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना आपली जात सांगवी लागतेय. सांगलीत (Sangali) हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. शेतकरी आणि दुकानदारांबरोबर वादाचे प्रसंग घडत आहेत. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते. अनुदान देण्यासाठी तीन-चार वर्षांपासून ई-पॉस मशिन यंत्रणा आहे. 

सांगलीमध्ये शेतकर्‍यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्‍यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. मात्र, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यानुसार शेतकर्‍यांची वर्गवारी करण्यात येत आहे. यासाठी शेतकर्‍यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

जातीचा ऑप्शन का समाविष्ट केलाय असा सवाल  उपस्थित होत आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथील खत विक्री दुकानांमध्ये याच मुद्द्यावरून शेतकरी आणि विक्रेत्यांच्या मध्ये वाद सुरू आहेत. केंद्र सरकारच्या खत मंत्रालयाामार्फत पॉस मशिन ही यंत्रणा चालविली जाते. दोन दिवसांपूर्वी मशिनचे सॉप्टवेअर अपडेट झाले आहे. नव्या सॉप्टवेअरमध्ये जातीची माहिती कशासाठी घेतली जात आहे. मात्र, याची माहिती प्राप्त नाही, माहिती मिळताच शेतकऱ्यांना ती कळवली जाईल अशी माहिती कृषी अधिकारी यांनी दिली आहे.