बर्ड फ्लू : पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

राज्यात ( Maharashtra) बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) कोंबड्या, पक्षी, कावळे यांचा मृत्यू होत आहे. पक्ष्यांचा मृत्यू काही ठिकाणी हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Updated: Jan 15, 2021, 09:05 PM IST
बर्ड फ्लू : पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा  title=

मुंबई : राज्यात ( Maharashtra) बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) कोंबड्या, पक्षी, कावळे यांचा मृत्यू होत आहे. पक्ष्यांचा मृत्यू काही ठिकाणी हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये आणि तात्काळ मदत मिळावी म्हणून फ्री टोल क्रमांक ( Bird Flu Toll Free number) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून मृत पक्ष्यांची भरपाईही देण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी नागरिकांना केले आहे.

  ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक झालेला आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरिता राज्यातील प्रत्येकाने दक्षता घेण्यात येणार आहे. दरम्यान, अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, अशी सर्व जनतेणे नोंद घ्यावी असेही  केदार यांनी आवाहन केले आहे.

राज्यातील १४ जानेवारी २०२१ रोजी, कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, लातूर ४७, गोंदिया २५, चंद्रपूर ८६, नागपूर ११०, यवतमाळ १०, सातारा ५०, त रायगड़ जिल्ह्यात ३, अशी ३३१ मृत झालेली नोंद आहे. सांगली जिल्ह्यात ३४, अमरावती व सोलापूर जिल्ह्यात 1 बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्ष्यांमध्ये व वर्धा येथे ८ मोर अशा एकूण ४४ पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात यवतमाळ, नंदुरबार ६. पुणे २ व जळगाव जिल्ह्यात २ अशा प्रकारे एकूण राज्यात ७ कावळ्यांमध्ये मृत आढळून आली आहेत.  ८ जानेवारी २०२१ पासून आजतागायत एकूण २३७८ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पूर्वी पाठवलेल्या नमून्याचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, घोडबंदर (जि.ठाणे) व दापोली या ठिकाणांचे कावळे आणि बगळे तसेच मुरुंबा (ता. जि. परभणी) या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पॅयोजैनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच5एन1 या स्ट्रेन) करिता आणि बीड येथील नमूने (एच5एन 8 या स्ट्रेन) करिता पॉझिटीव्ह आलेले आहेत. लातूर येथील नमुनेही सकारात्मक झाल्यानुसार, या क्षेत्रास "संसर्गग्रस्त क्षेत्र" म्हणून घोषित करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

या निर्बंधानुसार बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या पोल्ट्री फार्मपासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, मुरंबा (ता. जि. परभणी) येथील सुमारे 3443 व केंद्रेवाडी, ता. अहमदपूर व सुकानी जिल्हा लातूर येथील सुमारे ११०९२ कुवकट पक्षी, नष्ट करण्यात आले आहेत. तथापि, मुंबई, घोडबंदर (जि.ठाणे), दापोली व बीड येथे केवळ सर्वेक्षण सुरु ठेवण्यात आले आहे.  कावळ्यांचे एकूण ९ नमुने होकारार्थी आले असून त्यात मुंबई, बीड, ठाणे, रत्नागिरी, नाशिक व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे चंद्रपूर येथील एक नमुना नकारार्थी आढळून आला आहे.