'काँग्रेस उमेदवार चंद्रावरून नाही पण स्टेजवरून जे सांगतील ते करून दाखवतील'

या सभेसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जून खर्गे हेदेखील उपस्थित आहेत

Updated: Oct 13, 2019, 03:59 PM IST
'काँग्रेस उमेदवार चंद्रावरून नाही पण स्टेजवरून जे सांगतील ते करून दाखवतील' title=

औसा, लातूर : विधानसभा निवडणूक २०१९ च्या तारखा जाहीर झाल्यानंतर अचानक प्रचार सोडून परदेशात रवाना झालेले काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी पुन्हा भारतात परतलेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांची महाराष्ट्रातील पहिलीच प्रचारसभा लातूरच्या औसामध्ये पार पडतेय. या सभेसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे हेदेखील उपस्थित आहेत. यावेळी, विजनवासातून परतलेले राहुल गांधी आपल्या भाषणात आक्रमक भूमिकेत दिसले. मोदी सरकार जनतेला खऱ्या मुद्यांपासून भरकटवत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'मेक इन इंडिया'चं काय झालं? असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपा सरकारला धारेवर धरलं. आमचे उमेदवार चंद्रावरून नाही पण स्टेजवरून जे सांगतील ते करून दाखवतील, असा विश्वासही यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 

काय म्हणाले राहुल गांधी आपल्या भाषणात 

- खरे मुद्दे बाजुलाच राहिले... चंद्र, जपान, चीन, पाकिस्तान, कोरिया यांच्याच गप्पा मारल्या जात आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. 

- कर्जमाफी झाली का? रोजगार मिळाला का? अच्छे दिन आले का? कधी मोदी जीम कार्बेटमध्ये दिसतात... कधी चंद्रावर चर्चा चालते... पण बेरोजगारीवर चर्चा होत नाही... खऱ्या मुद्द्यांवरून भटकवण्याचं काम सुरू आहे.

- २ हजार कारखाने बंद पडले... ऑटो सेक्टरचं नुकसान झालं

- कपडे - डायमंड उद्योग संपले. नरेंद्र मोदी एक शब्द काढत नाहीत

- महाराष्ट्रात किती जणांचे कर्ज माफ केले. देशातील अंबानी अदानी यांचे किती कर्ज माफ झाले? १५ लोकांचे साडे पाच लाख कोटी रुपये माफ केले

- नोटबंदी, जीएसटी यांचे लक्ष्य काय होते? सामान्यांच्या खिशातून पैसा काढून उद्योगपतींच्या खिशात घातला

- कित्येक दिवसांपासून गायब असलेले राहुल गांधी आक्रमक भूमिकेत

- इस्त्रो काँग्रेसने स्थापन केले. चंद्रावर रॉकेट पाठवल्याने लोकांच्या पोटात अन्न जाणार नाही

- चीनचे राष्ट्राध्यक्ष आले होते... डोकलाममध्ये काय झालं होतं, हे मोदींनी विचारलं का?

- 'मेक इन इंडिया'चं काय झालं? पुण्यात जाऊन फॅक्टरी पाहा... 'मेक इन इंडिया' संपलं... बाय बाय टाटा गुड बाय

- आता तर नुकसान सुरू झाले आहे. येत्या ६-७ महिन्यांत अवस्था आणखीनच वाईट होईल. भाजपने अर्थव्यवस्था संपवली. बदल नक्की होणार. परंतु वाईट वाटतं सामान्यांना त्रास होतोय. तरुणांना हे माहित नाही की उद्या काय होईल? शेतकरी घाबरतोय. कर्जाखाली दबल्यामुळे झोप येत नाही.

- काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या हदयात आहे. काँग्रेस पक्षाची पाळंमुळं महाराष्ट्रात आहेत. काँग्रेस निवडणुकीत जिंकणार आहे.

 

या सभेनंतर राहुल गांधी यांची आज सायंकाळी मुंबईतल्या धारावी आणि चांदिवलीमध्येही सभा आयोजित करण्यात आलीय.