राजकारण झालं असेल तर इथेही बघा! विद्यार्थ्यांना शिकायचंय, पण कसं? शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात

अकोल्यात दोन गावांना जोडणारा पूल नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदी ओलांडत जीव धोक्यात घालून विद्यार्थी शाळेत जात आहेत. शिकायचंय पण कसं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. 

जयेश जगड | Updated: Jul 11, 2023, 06:31 PM IST
राजकारण झालं असेल तर इथेही बघा! विद्यार्थ्यांना शिकायचंय, पण कसं? शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : देशातील तळागाळातील मुलंही शिकावीत यासाठी अनेक योजना आणल्या गेल्या. 'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' असं घोषवाक्यही तयार करण्यात आलं. पण खरंच शिकण्यासारखी परिस्थिती आपल्या देशात आहे का? आपल्या देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरा केलं जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावं आजही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. अनेक योजना या गावांपर्यंत पोहोचल्याच नाहीएत. 

विद्यार्थ्यांना शिकायचंय पण?
शिक्षणाचं (Education) महत्व सर्वांना पटलं आहे आणि त्यामुळेच परिस्थिती असो किंवा नसो, आपल्या मुलाने शिकावं आणि चांगला माणूस बनावं अशी प्रत्येका पालकांचं स्वप्न असतं. इतकंच काय तर खेड्यापाड्यातील मुलंही शिक्षणासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. या मुलांना मुलभत सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी तिथल्या प्रशासनाची आहे. पण सुस्त प्रशास आणि फक्त राजकारणात रमलेले लोकप्रतिनीधी यांच्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. शिकायचंय पण कसं? असा प्रश्न विचारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलीय. 

अकोल्यातल्या विद्यार्थ्यांची व्यथा
प्रशासनाच्या अनास्थेचं ताजं उदाहरण म्हणजे अकोल्या जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक आणि दिग्रस खुर्द ही दोन गावं. दिग्रस बुद्रुक आणि दिग्रस खुर्द या दोन गावातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीव धोक्यात घालून दररोज प्रवास कराला लागतोय. दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाचं (Bridge) काम संथगतीने सुरु आहे. याला जाब विचारणारंही कोणी नाही. नदी ओलांडात विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं. पावसाळ्यात नदी ओसंडून वाहू लागली की विद्यार्थ्यांची शाळा बुडते. निर्गुणा नदीवरील पूल लवकरात लवकर बांधण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. 

शाळेत उशिरा पोहचले तर गुरुजींची छडी , पाऊस आला तर शाळेत जाता येत नाही अशा अनेक समस्यांना तोंड देत हे विद्यार्थी जीवघेणा प्रवास करीत शाळेकरिता जातात. दोन्ही गावांमध्ये असलेल्या निर्गुणा नदीवरील पुलाचं बांधकाम सुमारे साडेचार वर्षांपासून सुरू आहेय. त्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेत ये-जा करण्यासाठी कच्चा पूल तयार केला होता. मात्र, पावसात पूर आल्याने तो ही सुद्धा वाहून गेला. परिमाणी, जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात टाकून निर्माणाधीन पुलावरून ये-जा - करावी लागत आहेय..या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर अंतर कापावं लागतं. 

गावात अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाखिची आहे. पण मुलांना शिकण्याची त्यांच्या मनात जिद्द आहे. आपल्या वाटेला आलेली कष्ट मुलांच्या वाटेला येऊ नयेत, यासाठी जीवापार मेहनत करुन गावकरी आपल्या मुलांना शिकवत आहेत. मुलांनाही शिक्षणाची ओढ आहे. पण सुविधाच नसल्याने पालक आणि विद्यार्थी हतबल झालेत. 

राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडतायत. आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. अगदी खालच्या पातळीवर एकमेकांवर चिखलफेक केली जातेय. पण साऱ्या गोष्टींशी खेड्या-पाड्यातल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना काडीचा संबंध नाही. त्यांच्या केवळ माफक अपेक्षा आहेत. त्यामुळे राजकारण झालं असेल तर थोडं यांच्या प्रश्नावरही लक्ष द्या? असं म्हणण्याची वेळ आलीय.