Maharashtra Day 2019 : ...म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र दिन

जय महाराष्ट्र! 

Updated: May 1, 2019, 08:02 AM IST
Maharashtra Day 2019 : ...म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र दिन  title=
महाराष्ट्र दिन

मुंबई : 'मंगल देशा, पवित्र देशा.... प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा' असं म्हणत आज बुधवारी म्हणजेच १ मे या दिवशी सर्वत्र महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. अशा याच दिवशी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवसही साजरा केला जातो. आज सर्वत्र ५९ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या रुपरेषेअंतर्गत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 

१९५६ च्या States Re-organisation Act नुसार भारतातील राज्यांच्या सीमा या भाषेच्या आधारे निर्धारित करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. ज्यामध्ये मराठी, कोकणी भाषिकांचा समावेश असेल. तर, गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी वेगळ्या राज्चयाची मागणी करण्यात आली. याच मागण्या आणि आंदगोलनांच्या बळावर अखेर १ मे १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणूनच महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

असा घडला हा संघर्ष.... 

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून आणि अनेक लहानमोठ्या सभांमधून जळजळीत निषेध करण्यात येत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपारनंतर, म्हणजेच मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची कामाची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चे निघाले. फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी करण्यात आली होती. कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. पण, जमावबंदीला झुगारून मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यांना उधळून लावण्यासाठी लाठीमारही करण्यात आला. पण, तरीही ते चौकातून हटत नव्हते अखेर पोलिसांना त्यांच्यावर गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते. परिणामी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी १९५७ पर्यंत जे १०६ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घेत १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.