शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 संकटात बळीराजाला भक्कम आधाराची आवश्यकता आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.

Updated: Oct 23, 2020, 03:06 PM IST
शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  title=

मुंबई : अतिवृष्टीने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.  संकटामागून संकट आली आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत ३० हजार ८०० कोटी दिले आहेत. संकटात बळीराजाला भक्कम आधाराची आवश्यकता आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. केंद्राकडून अद्याप पैसे आलेले नाहीत. ३८ हजार कोटी केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत. मात्र, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना आज दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १० हाजर कोटी रुपयांचे नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केली आहे. दिवाळीपर्यंत मदत पोहोचवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. केंद्राकडून किती पैसे येणं बाकी आहे याची माहिती घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटीची मदतीची घोषणा करताना शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत देण्याचे सांगितले आहे. एकूण केंद्राकडून येणं ३८ हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत. अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. या आपत्तीत १० हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल.  पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. 

जिरायत, बागायत जमिनीसाठी ६८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. फळपिकांसाठी १८००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.