ONLINE व्यवहारांसंबंधीची सर्वात मोठी बातमी

यामध्ये अनेकदा काही अशा चुका घडतात जेव्हा पैशांचा व्यवहारच गोंधळतो

Updated: Apr 6, 2022, 06:07 PM IST
ONLINE व्यवहारांसंबंधीची सर्वात मोठी बातमी  title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

Banking Services: ऑनलाईन बँकिंगमुळं व्यवहाराची सुविधा अधिक सोपी आणि सोयीस्कर मार्गानं आपल्यापर्यंत पोहोचली.पण, यामध्ये अनेकदा काही अशा चुका घडतात जेव्हा पैशांचा व्यवहारच गोंधळतो. UPI, नेट बँकिंग, मोबाईल वॉलेट यांनी पैशांचे व्यवहार जितके सोपे केले तितक्याच काही अडचणीही आपल्या समोर आणून ठेवल्या. (Online banking)

बऱ्याचदा अनेकांचीच अशी तक्रार असते की पैसे कोणा दुसऱ्याच अकाऊंटवर पाठवले गेले. बस... असं व्हायची खोटी की आपल्या पायाखालची जमिनच घसरते. कारण, इथं मुद्दा पैशांचा असतो. (Net banking)

पैसे परत कसे मिळवावेत ? 
ऑनलाईन पैशांच्या व्यवहारादरम्यान तुमच्याकडूनही पैसे कोणा एका दुसऱ्या खात्यामध्ये गेल्यास न गोंधळता याची माहिती सर्वप्रथम तुमच्या बँकेला द्या. कस्टमर केअर क्रमांकावर फोन करत झाला प्रकार त्यांना कळवा. 

अनेकदा बँकेकडून ईमेलवर सदर प्रकरणीची माहिती मागितली जाईल. याची पूर्तता करा. व्यवहार झाल्याची तारीख, वेळ , खात्याचा क्रमांक आणि ज्या खात्यात पैसे गेले त्याची माहिती या साऱ्याचा उल्लेख करा. 

चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास याची माहिती बँक शाखा व्यवस्थापकापर्यंत पोहोचवा. कारण या माध्यमातून तुमचे पैसे कोणत्या शहरातील कोणत्या खात्यात गेले आहेत याची माहिती मिळते. ज्यानंतर तिथे तुमचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु होते. 

तुम्ही दिलेल्या माहितीच्या बळावर ज्या व्यक्तीच्या खात्यावर ही रक्कन अनावधानानं गेली आहे, त्याला यासंबंधीची माहिती बँक देते आणि हे पैसे परत करण्याची विनंती करते. 

दरम्यान, चुकून आलेले पैसे परत करण्यासही त्या व्यक्तीनं नकार दिल्यास पुढे न्यायालयात त्याच्याविरोधात खटला दाखल केला जातो. 

पैसे न परत करण्याच्या या परिस्थितीमध्ये हे सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित असतात. 

जेव्हा तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे कोणा दुसऱ्या खात्यामध्ये पाठवता तेव्हा तुम्हाला एक मेसेज येतो. ज्यामध्ये हा व्यवहार चुकीचा असल्यास याची माहिती दिलेल्या क्रमांकावर देण्याचं आवाहनही इथं करण्यात येतं. 

RBI नं सर्व बँकांना आदेश दिले आहेत की, चुकूनही पैसे दुसऱ्या खात्यात गेल्यास तुमच्या बँकेनं तातडीनं पावलं उचलणं अपेक्षित असेल. बँक तुमचे पैसे चुकीच्या खात्यातून योग्य खात्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्वी जबाबदार असेल.