नव्या संसद भवनात पंतप्रधानांकडून 'मिच्छामी दुक्कडम' म्हणत भाषणाला सुरुवात; काय आहे याचा अर्थ जाणून घ्या?

Michhami Dukkadam PM Modi: नव्या संसद भवनाचा शुभारंभ सोमवारी पार पडला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसद भवन खुले करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी एक शब्द वापरला होता. त्याचा काय अर्थ होतो जाणून घ्या 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 20, 2023, 06:58 AM IST
 नव्या संसद भवनात पंतप्रधानांकडून 'मिच्छामी दुक्कडम' म्हणत भाषणाला सुरुवात; काय आहे याचा अर्थ जाणून घ्या? title=
What is Michhami Dukkadam PM Modi said in the new Parliament what is the meaning

Michhami Dukkadam PM Modi: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर संसदेच्या विशेष सत्राचे आयोजनही करण्यात आले आहे. सोमवारी संसदेच्या विशेष संत्रात महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. तसंच, नवीन संसद भवनात देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी एका वाक्याचा उल्लेख केला.  भुतकाळातील कटूता विसरण्याची ही वेळ आहे. माझ्याकडून सर्वांना 'मिच्छामी दुक्कडम'. (Michhami Dukkadam) आता पंतप्रधान मोदींनी (Pm Modi) वापरलेल्या या शब्दाचा अर्थ काय आणि त्यांना आत्ताच हा शब्द का वापरला, यामागचे कारण जाणून घेऊया. 

खरं तर जैन धर्मियांचे संवत्सरी पर्व सुरू आहे. यालाच क्षमा वाणिका पर्व असंही म्हणतात. यावेळी मिच्छाडी दुक्कडम असं म्हणून सगळ्यांची माफी मागितली जाते. जैन धर्मियांनुसार, मिच्छामीचा अर्थ क्षमा करणे आणि दुक्कडमचा अर्थ चुकी असा होता. म्हणजेच माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करा, असा त्याचा अर्थ आहे. 

जैन धर्माचे पर्युषण पर्व आणि मिच्छामी दुक्कडम

जैन संप्रदायाचे लोक श्वेतांबर भाद्रपद मासाच्या कृष्णपक्षतील त्रयोदशीपासून शुक्ल पक्षाच्या पंचमी आणि दिगंबर भाद्रपद शुक्लातील पंचमी ते चतुर्दशीपर्यंत पर्यूषण पर्व साजरे केले जाते. या पर्वाच्या समाप्तीच्या दिवशी जैन धर्मिय एकमेकांना मिच्छामी दुक्कड असं म्हणतात. जैन धर्माच्या परंपरेनुसार, पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवस या क्षमावाणी दिवस म्हणजेच मैत्री दिवस असतो. यादिवशी सर्व जण एकमेकांना भेटून मिच्छाडी दुक्कड म्हणून माफी मागतात. पर्युषण पर्वात मिच्छाडी दुक्कडम या शब्दाचा वापर करणे शुभ आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. 

जैन धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी सर्व जण एकमेकांना मिच्छामी दुक्कडम यासाठी म्हणतात की अजाणतेपणी एखाद्या व्यक्तीला चुकीचे काही बोललं गेलं असेल त्यासाठी माफी मागितली जाते. त्यामुळं या खास दिवशी एकमेकांचा माफी मागितल्यास आपल्याकडून झालेल्या चुकीपासून मुक्तता मिळते. 

जैन धर्मियांच्या म्हणण्यानुसार, कधीतरी चुकून एखाद्या व्यक्तीसाठी आपल्या तोंडातून वाइट बाहेर पडतं. त्यामुळं तो व्यक्ती दुखी होतो. अशावेळी पर्युषण पर्वात त्याची माफी मागण्याची चांगली संधी असते. या दिवशी त्याच्या समोर जाऊन मिच्छामी दुक्कडम बोलून सगळी कटूता विसरून नात्यातील गोडवा वाढतो. त्यासाठीच पर्युषण पर्वात मिच्छामी दुक्कडम बोलण्याचे एक वेगळेच महत्त्व आहे.