निवडणुकीनंतर कोण-कोणते पक्ष भाजपला देऊ शकतात पाठिंबा

गरज पडल्यास कोणते पक्ष भाजपसोबत येऊ शकतात.

शैलेश मुसळे | Updated: May 8, 2019, 12:40 PM IST
निवडणुकीनंतर कोण-कोणते पक्ष भाजपला देऊ शकतात पाठिंबा title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ चं २ टप्प्यातील मतदान अजून बाकी आहे. विरोधकच नाही तर भाजपमधील काही नेत्यांना देखील असं वाटतं आहे की, भाजपला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे त्य़ांना इतर पक्षाची मदत घ्यावी लागेल. आधी सुब्रमण्यम स्वामी आणि त्यानंतर राम माधव यांनी याची शक्यता वर्तवली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील म्हटलं की, 'भाजपला बहुमत मिळणार नाही. त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.'

भाजपने यूपी, बिहार, महाराष्ट्र, पंजाब आणि तमिळनाडूसह पूर्वेतील राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत युती केली आहे. बाकी इतर राज्यांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे. २०१४ मध्ये भाजपने २७ पक्षांसोबत निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये भाजपला २८२ जागा तर एनडीएला ३३६ जागा मिळाल्या होत्या. पण नंतर टीडीपी आणि आरएलएसपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

२०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये निवडणुकीचं समीकरण बदललं आहे. भाजप विरोधात वेगवेगळ्या राज्यांमध्ये विरोधकांनी आघाडी केली आहे. तर भाजपने यूपीमध्ये अपना दल, बिहारमध्ये जेडीयू-एलजेपी, महाराष्ट्रात शिवसेना, पंजाबमध्ये अकाली दल, तमिळनाडुमध्ये AIADMK आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षासोबत युती केली आहे. जर भाजप बहुमताचा आकडा गाठू शकला नाही तर भाजप काँग्रेस विरोधी पक्षांची मदत घेऊ शकतो. 

भाजप कोणत्या पक्षांची घेणार मदत

१. यामध्ये पहिलं नाव आहे ते आंध्रप्रदेश मधील जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस. २०१४ मध्ये त्यांना काँग्रेसला रामराम करत नवा पक्ष स्थापन केला होता. आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला यंदा चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. पण जगन रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे की, ते त्याचं पक्षासोबत जातील जे आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देतील. काँग्रेससोबत त्यांच पटत नसल्याने जगन रेड्डी भाजपसोबत जाण्याची शक्यता अधिक आहे.

२. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पक्षावर देखील भाजपची नजर असणार आहे. मागील ५ वर्षात केसीआर यांनी पंतप्रधान मोदींसोबत चांगले संबंध बनवले आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीतही त्यांनी एनडीएच्या बाजुने मतदान केलं होतं. अनेक वेळा ते सरकारच्या बाजुने उभे राहिले आहेत. राज्यात केसीआर यांचा विरोधक काँग्रेस आहे. त्यामुळे गरज पडली तर केसीआर भाजपला पाठिंबा देऊ शकते.

३. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पक्ष बीजेडी देखील याआधी एनडीएचा मित्रपक्ष होता. मागील ५ वर्षात भाजपच्या कामांवर त्यांचं समर्थन होतं. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ते भाजपला समर्थन देऊ शकतात. कारण पटनायक यांचा काँग्रेससोबत छत्तीसचा आकडा आहे. मात्र ओडिशामध्ये देखील भाजपने पूर्ण ताकद लावली आहे.

४. भाजपची नजर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर देखील असेल. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने काँग्रेससोबत निवडणूक लढवली आहे. पण राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करु शकते. 

५. जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉफ्रेंसवर देखील भाजपची नजर आहे. भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ते भाजपसोबत होते. त्यामुळे गरज पडल्यास भाजप त्यांचं समर्थन घेऊ शकते.

६. उपेंद्र कुशवाहा यांचा आरएलएसपी बिहारमध्ये महाआघाडीसोबत निवडणूक लढवत आहे. पण याआधी कुशवाहा हे मोदी सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे भाजप त्यांना आपल्याकडे खेचण्याचा पुन्हा प्रयत्न करु शकते. याशिवाय मुकेश साहनी यांना काही जागा मिळाल्या तर वीआयपी पक्षाचं समर्थन भाजप घेऊ शकते.

७. जीतनराम मांझी यांचा हम पक्ष देखील पुन्हा एकदा भाजपमध्ये येऊ शकतो. याआधी ते एनडीएमध्येच होते. पण यंदाची निवडणूक त्यांना महाआघाडी सोबत लढवली आहे. 

८. हरियाणामधील ओम प्रकाश चौटाला यांचा इनेलो पक्षाचा पर्याय देखील भाजपकडे असेल. गरज पडली तर ते या पक्षाला देखील समर्थन मागू शकतात.