आधीच महागाईचा झटका, आता RBI च्या 'या' निर्णयामुळे EMI वाढीची डोकेदुखी 

आरबीआयच्या या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. 

Updated: May 4, 2022, 04:59 PM IST
आधीच महागाईचा झटका, आता RBI च्या 'या' निर्णयामुळे EMI वाढीची डोकेदुखी  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : गेले अनेक महिने ऐतिहासिक नीच्चांकीवरील (4 टक्के) असणारा रेपो रेट अखेर आज वाढवण्यात आला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी याबाबतची घोषणा केली. नवीन रेपो रेट हा 0.40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे आधीच बजेट सांभाळताना तारेवरची कसरत करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना EMI वाढीचा झटका बसला. RBI च्या या निर्णयामुळे आता होम लोनपासून ते कार लोन सर्वच महाग होणार आहे. 

रिझर्व्ह बँकेने अनेक दिवसांपासून जैसेथे ठेवलेला रेपो रेट आज अचानक वाढवला. दरम्यान आता एका फटक्यात हा रेपो रेट 0.40 टक्के वाढून 4.40 टक्के करण्यात आला आहे. 

आरबीआयच्या या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. RBI च्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांवर EMI बोजा वाढणार हे मात्र नक्की. 

सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडणार 
आधीच महागाईचा मार सोसणाऱ्या सर्वसान्य नागरिकांच्या खिशावर आता थेट परिणाम होणार हे स्पष्ट आहे. RBI च्या अत्यंत मोठ्या निर्णयामुळे आता होम लोन, कार लोन सोबतच सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजात वाढ होणार आहे. परिणामी ग्राहकांना भरावा लागणार EMI देखील वाढणार आहे. 

या'' कारणांमुळे महागाईचा भडका
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी MPC च्या च्या बैठकीनंतर माध्यमाशी संवाद साधला. यावेळी Shaktikanta Das म्हणालेत, "मार्च 2022 मध्ये किरकोळ असणारी महागाईत झपाट्याने वाढत 7 टक्क्यांवर पोहोचली. अन्नधान्यांच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीचा परिणाम एकूण महागाईवर झालेला पाहायला मिळतो. यासोबतच रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणामही महागाईवर झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

युद्धामुळे गव्हासह इतर विविध धान्यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. जागतिक पुरवठा साखळीवर म्हणजेच सप्लाय चेनवर  झालेल्या परिणामांमुळे महागाईचा भडका उडाल्याचं शक्तिकांता दास म्हणाले आहेत. 

अर्थव्यवस्थेची रिकव्हरी सुस्तच 
RBI ने रेपो रेटमधील वाढीसोबत कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच CRR देखील 0.50 टक्के वाढवण्याचं निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी घेतलेला निर्णय हा माध्यम अवधीच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घेण्यात आल्याचं नमूद केलं.यामुळे अर्थव्यवस्थेत वृद्धी होण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे. 

जागतिक अर्थव्यवस्थेतीतील रिकव्हरी संथ गतीने सुरु असल्याचं देखील RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.  

महागाईपासून दिलासा नाही, आरबीआयला भीती 
चालू आर्थिक वर्षात महागाईचा दबाव कायम राहण्याची भीती RBI ला आहे. आरबीआयच्या मते, वर्ष 2022-23 मध्ये महागाई दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. शक्तीकांत दास यांच्या मते पहिल्या तिमाहीत महागाई दर 6.30%, दुसऱ्या तिमाहीत 5.00%, तिसऱ्या तिमाहीत 5.4% आणि चौथ्या तिमाहीत 5.1% असू शकतो.