PM Modi Mother Death: काय होते मोदींच्या आईचे अखेरचे शब्द? आठवून पंतप्रधानांचेही डोळे पाणावले

PM Modi Mother Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मातोश्रींच्या निधनाचं वृत्त पंतप्रधानांनी स्वतः ट्वीट करत दिलं. 

Updated: Dec 30, 2022, 10:06 AM IST
PM Modi Mother Death: काय होते मोदींच्या आईचे अखेरचे शब्द? आठवून पंतप्रधानांचेही डोळे पाणावले  title=
PM Modis Mother Demise last meeting and last words of heeraben modi

PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आई, हिराबेन मोदी (Heeraben modi ) यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मातोश्रींच्या निधनाचं वृत्त पंतप्रधानांनी स्वतः ट्वीट करत दिलं. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर अहमदाबादच्या (ahamadabad) के. यू. एन. मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्यानंतर पंतप्रधानांनी अहमदाबादला जाऊन हिराबांची भेट घेतली होती. अखेर शतकभराच्या आयुष्याचा अस्त झाला आणि शुक्रवारी पहाटे तीन वाजता हिराबेन यांचं निधन झालं. निधनाचं वृत्त समजताच पंतप्रधान पुन्हा एकदा सर्व महत्त्वाची कामं तूर्तास रद्द करत दिल्लीहून अहमदाबादला रवाना झाले. 

आई म्हणजे तपस्विनी... 

पंतप्रधानांनी आईच्या निधनाचं वृत्त कळताच श्रद्धांजलीपर ट्विट केलं. यामध्ये आईच्या फोटोसह त्यांनी असे काही शब्द लिहिले, ज्यातून हिराबा यांच्या 100 वर्षांच्या आयुष्याचा प्रवास स्पष्टपणे झळकला. आयुष्याची शताब्दी ईश्वराच्या चरणी जाऊन थांबली, असं म्हणत त्यांनी आई गेल्याचं सांगितलं आणि तिची तुलना तपस्विनीशी केली. आपल्या मुल्यांप्रती समर्पित असणाऱ्या आणि कर्मयोगिणीप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या हिराबा यांनी दिलेला एक उपदेशही यावेळी पंतप्रधानांना आठवला. 

ते शब्द PM Modi आजही विसरु शकलेले नाहीत 

'बुद्धीनं काम करा आणि शुद्धीनं आयुष्य जगा' हा जगण्याचा अनोखा आणि यशस्वी मार्गावर नेणारा मंत्र हिराबा यांनी पंतप्रधानांना दिला होता. 100 व्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळी मोदींनी हिराबा यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हा उपदेश केला आणि आईचे हे शब्द पंतप्रधानांनी खुणगाठ बांधावी त्याप्रमाणं लक्षात ठेवले. 

आयुष्यात कायमच कोणतंही काम करताना बुद्धिचातुर्याचा वापर करा, कामाप्रती एकनिष्ठ राहा, समर्पक राहा असं सांगताना आपल्यातील प्रामाणिकपणा कायम जपून ठेवा हाच संदेश हिराबा यांनी दिला होता. जीवनातील पावित्र्य गमावू नका असा संदेशही त्यांनी लेकाला दिला होता. पंतप्रधानांच्या माध्यमातून त्यांच्या आईचे हे प्रभावी शब्द देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचले. हिराबा यांनी आपल्या मुलाला दिलेला हा संदेश प्रत्येक आईनं तिच्या मुलांना द्यावा इतका सुरेख आहे. 

पंतप्रधानांमध्ये कायमच दिसली हिराबा यांची झलक... 

अडचणी आणि आव्हानांनी हिराबा यांची पाठ सोडली नव्हती. पण, त्यातही त्यांनी अध्यात्माच्या बळावर हा प्रवास साध्य केला. जीवनात आलेल्या प्रत्येक आव्हानाला पाठीशी घेत त्याचीच ढाल करत त्या लढल्या आणि आपल्या मुलांचं संगोपन केलं. हिराबा यांच्यामध्ये असणारी दया, क्षमा, संवेदना आणि दुसऱ्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची क्षमता हे गुण त्यांच्या सर्व मुलांमध्ये दिसतात. पंतप्रधान मोदी यांच्यामध्येही हिराबेन यांचीच झलक कायम दिसून येते. मग ते त्यांचं बोलणं असो किंवा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन.