Fact Check : खोटा दावा करुन फसले राहुल गांधी; सरकारने केली पोलखोल

रेल्वेच्या खासगीकरणावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केलीय

Updated: Nov 13, 2022, 04:33 PM IST
Fact Check : खोटा दावा करुन फसले राहुल गांधी; सरकारने केली पोलखोल title=

कॉंग्रेसचे (congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सातत्याने केंद्र सरकारवर (Central Government) सातत्याने टीका करतात. सध्या राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान (bharat jodo yatra) देशभरात पायी प्रवास करत आहेत. यादरम्यानही राहुल गांधी मोदी सरकारच्या (Modi Government) धोरणांवरुन जोरदार टीका करत आहेत. अशातच राहुल गांधी यांनी रेल्वेच्या खासगीकरणावरुन (railway privatisation) एक ट्विट केले आहे. मात्र या ट्विटमुळे राहुल गांधी यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. 

राहुल गांधी यांनी अनेकदा खासगीकरणावरुन (privatisation) मोदी सरकारवर निशाणा साधला होता. मात्र आता राहुल गांधी यांनी रेल्वेच्या खासगीकरणाबाबत केलेला दावा खोटा असल्याचे सरकारने म्हटले आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (PIB) राहुल गांधी यांचा हा दावा खोटा ठरवला आहे. यासोबत सरकारने रेल्वेने आपल्या कुठल्याही संपत्तीचे  खासगीकरण केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) प्रश्न उपस्थित केले होते.

राहुल गांधींचे ट्विट

राहुल गांधी यांनी खासगीकरणाबाबत शनिवारी ट्विट केले होते. '12 लाख लोकांचा रोजगार, 2.5 कोटी देशवासीयांची रोजचा वापर.  भारतीय रेल्वे देशाला जोडते. पंतप्रधानजी रेल्वे ही देशाची संपत्ती आहे, तिचे खासगीकरण नव्हे तर सक्षमीकरण व्हायला हवं. ती विकू नका!' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. या  ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता, ज्यामध्ये काही लोक रेल्वेच्या खासगीकरणावर बोलत आहेत. यासोबतच काही बातम्यांही  शेअर केल्या होत्या.

पीआयबीचे (PIB) स्पष्टीकरण

पीआयबीने राहुल गांधी यांचा दावा खोटे असल्याचे म्हटले आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलने याबाबत एक ट्विट केले आहे. 'एका ट्विटमधून असा खोटा दावा केला जात  आहे की 151 भारतीय रेल्वे गाड्या, रेल्वे मालमत्ता, स्टेशन्स आणि हॉस्पिटल्सचे खाजगीकरण करण्यात आले आहे. हे दावे पूर्णपणे खोटे आणि तथ्यहीन आहेत आणि रेल्वे मंत्रालय आपल्या कोणत्याही मालमत्तेचे खाजगीकरण करत नाही,' असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यानच हे ट्विट करण्यात आले आहे. सध्या राहुल गांधी यांची पदयात्रा ही महाराष्ट्रात आहे. 7 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही यात्रा कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर असा प्रवास करणार आहे. आतापर्यंत, भारत जोडो यात्रेने 67 दिवसांत 6 राज्यांतील 28 जिल्ह्यातून प्रवास केला आहे.