पर्सनल लोनबाबत RBI ने बदलले नियम, ग्राहकांना करावा लागणार अडचणींचा सामना

RBI Rules For Personal Loan : येत्या काळात लोकांना क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन घेताना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यासंदर्भातील नियम कडक केले आहेत.

आकाश नेटके | Updated: Nov 17, 2023, 11:54 AM IST
पर्सनल लोनबाबत RBI ने बदलले नियम, ग्राहकांना करावा लागणार अडचणींचा सामना title=

Personal Loans : सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण तुमचं वैयक्तिक कर्ज (Loans) आता आणखी महागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वैयक्तिक कर्ज वितरणाच्या नियमामध्ये मोठा बदल केलाय. जर कोणतीही बँक किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) वैयक्तिक कर्ज देत असेल. तर त्यासाठीची बफर राखीव रक्कम 25 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँक आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीसाठी हा नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आलाय. त्यामुळे आता वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे. गृहकर्ज, शिक्षण कर्ज, गाडी घेण्यासाठीचं कर्ज आणि सोने तारण ठेवून घेतलेल्या कर्जावर मात्र या नियमाचा प्रभाव पडणार नसल्यानं सामान्यांना तेवढाच दिलासा मिळालाय.

रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFC) असुरक्षित मानल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाशी संबंधित नियम आणखी कडक केले आहेत. राखीव रक्कम 25 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे असुरक्षित कर्ज बुडण्याची भीती लक्षात घेता बँकांना आता पूर्वीपेक्षा 25 टक्के अधिक तरतूद करावी लागणार आहे. आत्तापर्यंत बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी ग्राहक कर्जाचे बफर राखीव रक्कम 100 टक्के होती. ती आता 125 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मात्र सुधारित नियम काही ग्राहकांना लागू होणार नाहीत. यामध्ये गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वाहन कर्जाचा समावेश आहे. या प्रकारच्या कर्जासाठी नवीन नियम लागू होणार नाहीत. 

यापूर्वी, ऑक्टोबरच्या पतधोरणात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहक कर्जाच्या अनेक विभागांमधील प्रचंड वाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच बँकांना त्यांच्या स्वत: च्या हितासाठी अंतर्गत पडताळणी प्रक्रिया मजबूत करण्याचा सल्ला दिला होता.  त्यांनी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना त्यांच्या अंतर्गत देखरेख प्रणाली मजबूत करण्याचा सल्ला दिला, वाढत्या जोखमींना सामोरे जावे आणि त्यांच्या स्वतःच्या हितासाठी योग्य सुरक्षा पावले उचलावीत, असेही दास यांनी म्हटले होते. यासोबत शक्तिकांत दास यांनी ग्राहक कर्ज श्रेणीतील काही कर्जांमध्ये जास्त वाढ होण्याबद्दल सांगितले होते. दास यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठ्या बँकांच्या एमडी/सीईओ आणि मोठ्या एनबीएफसी यांच्याशी संवाद साधताना ग्राहक कर्जामध्ये उच्च वाढ याबाबत भाष्य केले होते.