३०० दहशतवादी मारलेत का झाडं उपटलीत? सिद्धूंचा वादग्रस्त प्रश्न

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेनं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्यावर काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Updated: Mar 4, 2019, 05:19 PM IST
३०० दहशतवादी मारलेत का झाडं उपटलीत? सिद्धूंचा वादग्रस्त प्रश्न title=

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेनं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्यावर काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सिद्धू यांनी याबद्दल एक ट्विट केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले, हो का नाही? एअर स्ट्राईकचा उद्देश काय होता? तुम्ही दहशतवादी मारलेत का झाडं पाडलीत? हा निवडणुकीसाठीचा हातखंडा आहे का? सेनेचं राजनितीकरण करणे बंद करा. ऊंची दुकान फीका पकवान, असं ट्विट करून सिद्धू यांनी या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले.

काँग्रेसचे दुसरे नेते कपील सिब्बल यांनीही या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले. 'बालाकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय मीडियानी शंका उपस्थित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर उत्तर दिलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय मीडिया पाकिस्तानचं समर्थन करत आहे का? जेव्हा आंतरराष्ट्रीय मीडिया पाकिस्तानविरुद्ध बोलते तेव्हा तुम्ही खुश होता. जेव्हा ते प्रश्न विचारतात तेव्हा ते पाकिस्तानचं समर्थन करत असतात का? असे प्रश्न मला मोदींना विचारायचे आहेत, असं कपील सिब्बल म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्याबद्दल भारतीय वायुसेनेचे प्रमुख बीएस धनोआ यांनी पत्रकार परिषद घेतली. बालाकोट येथे एअर स्ट्राईक झाला असून, यामध्ये दहशतवादी तळांवर निशाणा साधला गेल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली.

एखाद्या ठिकाणाला निशाणा करुन तेथे हल्ला करण्याचं ठरवण्यात आल्यानंतरच आम्ही त्यावर निशाणा साधतो. आणि इथे आम्ही तो साधला. नाहीतर पाकिस्तानने या प्रकरणी वक्तव्य का केलं असतं? असा प्रश्न धानोआ यांनी उपस्थित केला. भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकच्या पुराव्यांची मागणी काही विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं होतं. ज्यांना धानोआ यांनी पूर्णविराम दिला.

वायुदलाने ठरलेल्या ठिकाणी हल्ला करत शत्रूला उध्वस्त केलं असल्याचं म्हणत या हल्ल्यात एकूण किती दहशतवादी ठार झाले याविषयीचा अधिकृत आकडा सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. याविषयीची माहिती सरकारकडून देण्यात आल्याचं म्हणत मृतदेहांची मोजदाद हे आमचं काम नसल्याचं त्यांनी सांगितलं.