कासगंज हिंसेतील 'मृत' राहुल उपाध्याय निघाला जिवंत

 सोशल मीडियावरही जखमी राहुलचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त होते. मात्र, प्रत्यक्षात राहुल जिवंत असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, काही अतीउत्साही संघटनांनी राहुलला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमही उरकून घेतला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 29, 2018, 05:20 PM IST
कासगंज हिंसेतील 'मृत' राहुल उपाध्याय निघाला जिवंत title=

कासगंज : प्रजासत्ताक दिनी उत्तर प्रदेशातील कासगंज येथे घडलेल्या हिंसाचाराबाबत धक्कादायक बातमी पुढे येत आहे. या प्रकरणाबद्धल समाजमाध्यमं (सोशल मीडिया) प्रसारमाध्यमं याबाबत वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लिहीले बोलले जात आहे. मात्र, हिंसाचारादरमयान, झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या चंदन गुप्ता याच्यासोबत आणखी एका युवकाचे नाव पुढे आले होते. राहुल उपाध्याय असे त्या युवकाचे नवा असल्याचे सांगण्यात येत होते. सोशल मीडियावरही जखमी राहुलचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त होते. मात्र, प्रत्यक्षात राहुल जिवंत असल्याचे पुढे आले आहे.

राहुलच्या शरीरावर कोणतीही जखम नाही

या प्रकरणाबात एनबीटीने दिलेल्या वृत्तात राहुल जीवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या वृत्तात म्हटले आहे की, राहुल उपाध्याय हा कासगंजपासून सुमारे १० किलोमिटर दूर अंतरावर असलेल्या नगलागंज गावात राहतो. त्याच्या मृत्यूचे वृत्त येताच पोलिसांनीही तपास सुरू केला. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी (२६, जानेवारी) हिंसाचार घडला तेव्हा आपण तेथे उपस्थितच नव्हतो. ही घटना घडली तेव्हा आपण नगलागंज येथील आपल्या राहत्या घरीच होतो. तसेच, राहुलच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम किंवा ताज्या जखमेचे व्रणही नसल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांचा राहुलशी संवाद

वादग्रस्त प्रकरणात नाव आल्यानंतर राहुलला कोतवाली येथील कासगंज येथे आणण्यात आले. जेथे त्याचा संवाद आगरा झोनचे एडीजी अजय आनंद आणि अलिगड रेंजचे आयजी संजीव गुप्ता तसेच, अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी झाला.

दरम्यान, काही अतीउत्साही संघटनांनी राहुलला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमही उरकून घेतला.