Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये भाजपाच्या पराभवाची 6 प्रमुख कारणं, 'या' चुका पडल्या महाग

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेस (Congress) भाजपाचा (BJP) दारुण पराभव करत असल्याचं दिसत आहे. भाजपाने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या हाती अपयश आलं आहे. दरम्यान यानिमित्ताने भाजपाच्या पराभवाची कारणं जाणून घेऊयात...  

शिवराज यादव | Updated: May 13, 2023, 01:21 PM IST
Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये भाजपाच्या पराभवाची 6 प्रमुख कारणं, 'या' चुका पडल्या महाग title=

Karnataka Election 2023: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीआधी होणारी ही निवडणूक भाजपा (BJP) आणि काँग्रेससाठी (Congress) रंगीत तालीम आहे. पण या निवडणुकीत भाजपाचा काँग्रेसकडून दारुण पराभव करत सत्तेवर येताना दिसत आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याने त्यांच्या विजयाची आणि भाजपाच्या पराभवाची नेमकी काय कारणं आहेत यावर चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने भाजपाच्या पराभवाची नेमकी काय कारणं आहेत जाणून घ्या....

1) चेहरा नाही

कर्नाटकमध्ये भाजापकडे मजबूत चेहरा नाही. येदियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना भाजपाने मुख्यमंत्री केलं असलं, तरी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसून ते आपला ठसा उटमवण्यात अयशस्वी ठरले. दुसरीकडे काँग्रेसकडे डी के शिवकुमार आणि सिद्धरमय्या यांच्यासारखे मजबूत चेहरे आहेत. बोम्मई यांना पुढे करत निवडणुकीच्या मैदानात उतरणं भाजपाला चांगलंच महागात पडलं आहे. 

2) भ्रष्टाचार 

भाजपाच्या पराभवामागे भ्रष्टाचाराचा मुद्दाही महत्त्वाचा राहिला. काँग्रेसने भाजपाविरोधात सुरुवातीपासूनच '40 टक्के पे - मुख्यमंत्री भ्रष्टाचार' असा अजेंडा सेट केला होता आणि हा मुद्दा नंतर मोठा झाला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन एस ईशरप्पा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, तर एका भाजपा आमदाराला जेलमध्ये जावं लागलं. स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने याप्रकरणी थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली. निवडणुकीत भ्रष्टाचाराचा हा मुद्दा भाजपासाठी फार महाग ठरला आणि त्यावर ते कोणताही तोडगा काढू शकले नाहीत. 

3) राजकीय समीणकरण साधण्यात अयशस्वी

कर्नाटकात भाजपा राजकीय समीकरण साधू शकली नाही. भाजपाने कोअर व्होट बँक लिंगायत समाजाला आपल्याशी जोडून ठेवलं नाही. तसंच दलित, आदिवासी, ओबीसी आणि वोक्कालिंगा समाजाचं मनही जिंकू शकले नाहीत. तर काँग्रेस मुस्लिमांपासून ते दलित आणि ओबोसीला जोडून ठेवण्यासह लिंगायत समाजाची मतं मिळवण्यातही यशस्वी ठरली. 

4) ध्रुवीकरण करु शकले नाहीत

कर्नाटकमध्ये भाजपा नेते हलाला, हिजाबपासून ते अजानपर्यंतचा मुद्दा उचलत होते. पण निवडणुकीवेळी हनुमानाची चर्चा सुरु झाली, आणि भाजपाचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याची योजना अयशस्वी झाली. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासन दिलं होतं तर भाजपान बजरंग दलाला थेट हनुमानाशी जोडलं आणि हा सगळा देवाचा मुद्दा करुन टाकला. भाजपाने हिंदुत्वचं कार्ड खेळलं पण त्याचा काही फायदा झाला नाही. 

5) येदियुरप्पासारख्या मोठ्या नेत्यांना बाजूला करणं महागात

कर्नाटकमध्ये भाजपाला मोठं करण्यात माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचं फार योगदान आहे. पण या निवडणुकीत त्यांना बाजूला करण्यात आलं होतं. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना भाजपाने तिकीट नाकारलं आणि दोन्ही नेते काँग्रेसच्या साथीने निवडणुकीच्या मैदानात उतरले. येदियुरप्पा, शेट्टार आणि सावदी तिघेही लिंगायत समाजाचे मोठे नेते असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं भाजपाला महागात पडलं. 

6) सत्तेविरोधातील लाट

कर्नाटकात भाजपाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे, ते सत्ताविरोधी लाट थांबवू शकले नाहीत. भाजपाविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. राज्यात सत्तेविरोधातील वातावरण असताना भाजपा त्याला तोंड देण्यात पूर्पपणे अपयशी ठरली.