'मला निर्भयाच्या दोषींना फाशी द्यायचेय'

महिला नेमबाजाने गृहमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र

Updated: Dec 15, 2019, 01:11 PM IST
'मला निर्भयाच्या दोषींना फाशी द्यायचेय' title=
फोटो सौजन्य : एएनआय

लखनऊ : निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवण्याची केंद्र सरकारकडून तयारी सुरु आहे. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने पत्र लिहित, निर्भया प्रकरणातील दोषींना एका महिलेद्वारे फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:चं नाव पुढे केलं आहे. 

निर्भया बलात्कारप्रकरणी चारही दोषींना एका महिलेकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी. दोषींना फाशी देण्यासाठी मी तयार आहे. यामुळे एक महिलाही फाशी देऊ शकते, असा वेगळा संदेश देशभरात जाईल. माझ्या मागणीला महिला कलाकार, महिला खासदांरांनी पाठिंबा द्यावा. मला आशा आहे की, यामुळे समाजात एक वेगळा बदल होईल, असं वर्तिका यांनी आपल्या पत्राद्वारे म्हटलं आहे.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीच्या 'निर्भया' प्रकरणातल्या दोषींना फाशी कधी होणार? असा संतप्त सवाल देशभरातून होत आहे. चारही आरोपींना लवकरात लवकर फाशी होण्याची मागणी करण्यात येत आहे. निर्भया प्रकरणातील चारही दोषी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत आहेत. चौघांनाही एकत्र फाशी देण्याची तयारी सुरु आहे. 

आरोपी विनय शर्माच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींकडून लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. मेरठमधील पवन जल्लाद यांना दिल्लीतील तिहार जेलमध्ये बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दोषींना फाशी झाली पाहिजे. माझी पूर्ण तयारी असून जेव्हा तिहार जेलमध्ये बोलवण्यात येईल, त्यावेळी जाणार असल्याचं ते म्हणाले. फाशी देण्याआधी आरोपींची ट्रायल होणार असून त्यांचं वजन तपासलं जाणार आहे. त्यानंतर इतरही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार असल्याचं पवन यांनी सांगितलं.

फाशीसाठी बक्सर दोरखंडाचा केला जातो वापर, पण का? जाणून घ्या...