राजीव गांधी हत्येतील आरोपीचा मृत्यू, माजी पंतप्रधानांच्या नावे उभारलेल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील एका आरोपीचा आज मृत्यू झाला. या आरोपीवर ज्या रुग्णालयात उपचार सुरु होते, त्या रुग्णालयाचं नाव राजीव गांधी असं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या आरोपाला सोडण्यात आलं होतं. 

राजीव कासले | Updated: Feb 28, 2024, 03:25 PM IST
राजीव गांधी हत्येतील आरोपीचा मृत्यू, माजी पंतप्रधानांच्या नावे उभारलेल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास title=

माजी पंतप्रधान राजीव गांधी (Former Prime Minister Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी  7 आरोपींची सुटका करण्यात आली होती, त्यापैकी एका आरोपीचा बुधवारी मृत्यू झाला. हा आरोपीवर चेन्नईच्या राजीव गांधी सरकारी रुग्णालयात (RGGGH) उपचार सुरु होते. हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) त्याचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी दिली आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार मृत आरोपीचं नाव टी सुथेंद्रराजा उर्फ संथन (Santhan alias Suthenthiraraja) असं होतं. राजीव गांधी हत्याकांडातील सात आरोपींपैकी संथन हा एक होता.

राजीव गांधी रुग्णलयात होता दाखल 
श्रीलंकन नागरिक असलेल्या संथनवर काही दिवसांपासून राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयाचे जीन डॉ. वी. थेरानीराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 7.50 वाजता सेंथनचा अचानक मृत्यू झाला. डॉ. वी. थेरानीराजन यांनी संथन याचं यकृत खराब झालं होतं, अशी माहिती दिली. यावर राजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण बुधवारी सकाळी त्याला कार्डियाक अरेस्ट धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला.

नोव्हेंबर 2022 मध्ये सुटका
राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने 1999 मध्ये संथनसह तीन आरोपींची शिक्षा कायम ठेवलं होती. यात संथन, मुरुगन आणि पेरारिवलन या आरोपींचा समावेश होता. नोव्हेंबर 2022 मध्ये या तिघांचीही सुटका करण्यात आली. 

सुटकेनंतर परदेशी नागरिकांसाठी असलेल्य भारतीय नियमानुसार संथनला त्रिचीतल्या एक शिबिरात ठेवण्यात आलं होतं. श्रीलंकेनं नुकतंच त्याची मायदेशात परतण्याची कागदपत्र तयार केली होती. 

राजीव गांधी यांची हत्या
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 मध्ये एका निवडणूक रॅलीत बॉम्ब स्फोटाने हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) या श्रीलंकेतील सशस्त्र तमिळ फुटीरतावादी संघटनेने याची जबाबदारी घेतली. एलटीटीईला तत्कालीन सरकारची धोरणे पसंत नव्हती. यासाठी त्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्यांनी आपली काही माणसं पेरली. त्या काळी दक्षिण भारतात निवडणूक प्रचार सुरु होता. या प्रचारात कलैवानी राजरत्नम उर्फ धुन नावाची महिला रात्री साधारण 10.10 मिनिटांनी राजीव गांधी यांच्या पाया पडण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ गेली. तिच्या कपड्यांच्या आत आरडीएक्स स्फोटक होती. 

पाया पडताना तीने स्फोट घडवून आणला आणि यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यात एकूण 14 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले.