ऐतिहासिक आर्थिक सुधारणांच्या बजेटची 30 वर्षे; डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केल्या भावना

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 30 वर्षापूर्वी आजच्या दिवशी एक ऐतिहासिक बजेट सादर केले होते

Updated: Jul 24, 2021, 04:09 PM IST
ऐतिहासिक आर्थिक सुधारणांच्या बजेटची 30 वर्षे; डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केल्या भावना title=

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 30 वर्षापूर्वी आजच्या दिवशी एक ऐतिहासिक बजेट सादर केले होते. या बजेटमध्ये आधुनिक भारताच्या आर्थिक विकासाचा पाया रचण्यात आला होता. जगासाठी भारतात गुंतवणूकीचे दरवाजे खुले केले होते. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री होते आणि पंतप्रधान नरसिंह राव होते. यानिमित्ताने मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशासमोरील वाटचाल आव्हानात्मक
देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण सुरू झाले त्याला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे जी परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये वाटचाल आव्हानात्मक ठरू शकते. सध्याची भारताची आर्थिक स्थिती 1991 पेक्षाही आव्हानात्मक आहे. एक राष्ट्र म्हणून भारताला आता कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे हे निश्चित करणे गरजेचे आहे.

कॉंग्रेसने केली आर्थिक सुधारणांची सुरूवात
पीटीआयच्या मते मनमोहन सिंग यांनी म्हटले की, 1991 मध्ये कॉग्रेस पार्टीने भारतातील अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण सुधारणा केल्या. देशातील आर्थिक धोरणांसाठी नवी दिशा दिली. त्यामुळे भारत आता जगातील महत्वाच्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

30 कोटी लोकं गरिबीतून बाहेर आले.

मनमोहन सिंग यांनी म्हटले की, आर्थिक सुधारणांमुळे गेल्या 30 वर्षांत 30 कोटी भारतीय नागरिक गरीबीतून बाहेर आले.  नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. सुधारणांच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी लोकांना स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण झाली. भारतात अनेक मल्टीनॅशनल कंपन्या काम करीत आहेत. त्यामुळे भारत वैश्विक शक्ती म्हणून उदयास आली आहे.

कोविडमुळे गेलेल्या नोकऱ्यांमुळे दुःखी

मनमोहन सिंग यांनी यानिमित्ताने कोविडमुले लोकांच्या गेलेल्या नोकऱ्यांवरही दुःख व्यक्त केले. ते म्हटले की, मी भाग्यशाली आहे, की कॉंग्रेसमध्ये अनेक सहकार्यांच्या सोबत आपण आर्थिक सुधरणांची प्रक्रिया राबवली. अद्यापही आरोग्य आणि शिक्षण हे क्षेत्र मागे राहिले आहेत. आपल्या आर्थिक प्रगतीसह ते चालू शकलेले नाहीत. कोविडमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ते व्हायला नको होते.