Video : "8-10 वर्षे काही होणार नाही"; मोरबी पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या कंपनींच्या मालकाचा दावा ठरला फोल

झुलता पूल कोसळून 132 हून अधिक जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Updated: Nov 2, 2022, 09:42 AM IST
Video : "8-10 वर्षे काही होणार नाही"; मोरबी पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या कंपनींच्या मालकाचा दावा ठरला फोल title=

गुजरातमधील (Gujarat) मोरबी (morbi) येथे पूल कोसळल्याने (Bridge Collapse) अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून त्या भयानक प्रसंगाची दाहकता दिसून आली. मोरबी (Morbi Bridge Collapse) येथील झुलता पूल कोसळून 132 हून अधिक जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) पुलाच्या देखभाल आणि व्यवस्थापन असलेल्या कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. भारतीय दंड संहितेची कलम 304, 308 आणि 114 लावण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने योग्यरित्या काम केले नाही. हा पूल (Bridge Collapse) दुरुस्तीसाठी सात महिने बंद असताना 26 ऑक्‍टोबर रोजी दर्जाची तपासणी न करता हा पूल जनतेसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. (gujarat morbi bridge collapse oreva owner jaysukh patel video viral)

दुरुस्ती व व्यवस्थापनाची जबाबदारी खुद्द मोरबीच्या ओरेवा ग्रुपकडे (orva group) देण्यात आली होती. ही कंपनी अजंता मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडचा (Ajanta Manufacturing Pvt Ltd ) एक भाग आहे जी घड्याळांसाठी प्रसिद्ध आहे. अपघातानंतर स्थानिक संस्था आणि खासगी संस्था यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मात्र यादरम्यान ओरेवा कंपनीच्या (orva group) व्यवस्थापकीय संचालकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ओरेवाचे व्यवस्थापकीय संचालक जयसुखभाई पटेल आपल्या परिवारासोबत दिसत आहेत.

सहा महिन्यांच्या नूतनीकरणानंतर ऐतिहासिक झुलता पूल पुन्हा सुरू करण्याची घोषणा करताना, मोरबीस्थित ओरेवा समूहाचा भाग असलेल्या अजंता मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष जयसुख पटेल यांनी 24 ऑक्टोबर रोजी दावा केला होता की हा पूल आणखी 15 वर्षे सहज टिकेल. पण 26 ऑक्टोबरला हा पूल खुला केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत कोसळल्याने हा दावा फोल ठरला आहे. "आम्ही जिंदालसारख्या कंपन्यांकडे झुलत्या पुलासाठी आवश्यक सुधारित तांत्रिक वैशिष्ट्यांसह विशेष उपकरणांची ऑर्डर दिली होती. आमच्या कंपनीला पुलाच्या देखभाल, ऑपरेशन आणि सुरक्षेसाठी 15 वर्षांचा करार करण्यात आला आहे," असे जयसुखभाई पटेल यांनी म्हटले होते. त्यांनी दावा केला होता की मोरबीचा झुलता पूल इतका मजबूत झाला आहे की 8-10 वर्षे कोणीही तो हलवू शकत नाही.

"मोरबीचा पूल 150 वर्षे जुना राजशाहीच्या काळापासूनचा आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. मोरबी नगरपालिकेशी सामंजस्य आहे आणि 15 वर्षांपासून देखभाल, सुरक्षा आणि ऑपरेशनची जबाबदारी आमच्या कंपनीला देण्यात आली आहे. हा झुलणारा पूल ऐतिहासिक आहे. गेल्या 6 महिन्यांपासून आम्ही हा पूल पूर्ण आणि अंतिम देखभालीसाठी बंद केला होता. गुजराती नववर्षाच्या दिवशी आम्ही ते लोकांसाठी सुरु करू. जेव्हा हा पूल बांधला गेला, त्या काळात फारसे तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे या झुल्याच्या पुलावर लाकडी स्लॅब आणि बीम लावण्यात आले. आम्ही आमच्या विशेष गरजा कंपन्यांना सांगितल्या. त्यांनी आम्हाला त्याच प्रकारचे साहित्य दिले. प्रकाश भाईंच्या कंपनीला 2007 मध्ये भूकंपात झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीचे कामही देण्यात आले होते. त्याच कंपनीला आम्ही कामही दिले असून हे काम 2 कोटींचे झाले आहे. आम्ही पुलाची 100 टक्के दुरुस्ती केली आहे. मोरबी नगरपालिका व जिल्हाधिकारी यांच्याकडे शुल्क निश्चित करण्यात आले असून दरवर्षी एक-दोन रुपयांनी दरवाढ होणार आहे. आमच्या म्हणण्यानुसार पुलाच्या दुरुस्तीनंतर 8 ते 10 वर्षे झुलत्या पुलाचे काहीही होणार नाही," असे जयसुखभाई पटेल म्हणताना दिसत आहेत.

गुजरात सरकारने मोरबी दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. गुजरात पोलिसांनी पुलाच्या दुरुस्तीत गुंतलेल्या खासगी कंपन्यांविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न या कलमांखाली दोषींविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना अटकही केली आहे.