50 टक्क्यांहूनही अधिक ट्रेन होणार बंद

रेल्वे बोर्डाकडून याबाबत निर्णय घेण्यात आल्यास येत्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतर अल्पावधीतच हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 6, 2017, 09:03 AM IST
50 टक्क्यांहूनही अधिक ट्रेन होणार बंद title=

नवी दिल्ली : प्रवासादरम्यान रेल्वेला प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांसाठी काहीशी धक्कादायक बातमी आहे. 2018 या आर्थिक वर्षात केंद्रीय रेल्वे मंत्रालय तुमचे रेल्वेशी असलेले नाते तोडू शकते. कारण, प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी रिकाम्या चालणाऱ्या रेल्वेगाड्यांचा अभ्यास करून त्या बंद किंवा अन्य ट्रेनमध्ये मर्ज करण्याचा विचार केंद्रसरकारच्या विचाराधीन आहे. रेल्वे बोर्डाकडून याबाबत निर्णय घेण्यात आल्यास येत्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतर अल्पावधीतच हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास तब्बल एकुण ट्रेनच्या 50 टक्क्यांहून अधिक रेल्वेगाड्या बंद होण्याची शक्यता आहे.

..तर रेल्वेगाड्यांचे केवळ वेळापत्रक बदलण्यात येईल

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू असून, लवकरच त्याबाबतचा ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, या निर्णयाचा फटका किती रेल्वे गाड्यांना बसेल याबाबत आकडेवारी उपलब्ध नाही. पण, हा आकडा 50 टक्क्यांहून अधिक असू शकतो, अशी चर्चा आहे. सूत्रांनी असेही म्हटले आहे की, हा निर्णय तेव्हाच घेतला जाईल जेव्हा, बंद केल्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांनाऐवजी पर्याय म्हणून इतर रेल्वेचा उपलब्ध असतील. उदा. जर एकाच मार्गावर दोन गाड्या धावत असतील आणि त्यात पुरेशी प्रवासी संख्या नसेल तर, त्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येईल.

... तर त्या रेल्वे गाड्या बंदच कराव्यात

रेल्वे बोर्डाचे म्हणने असे की, मार्ग कमी आणि रेल्वेची संख्या अधिक अशी सध्याची स्थिती अधीक आहे. त्यामुळे रूळांवर कमालीचा ताण येतो. त्याचा परिणाम प्रसंगी अपघात किंवा रेल्वे उशीराने धावण्यातही होतो. अशी स्थिती टाळण्यासाठी प्रवासी संख्या कमी असलेल्या गाड्यांची संख्या कमी करून इतर गाड्यांची गती वाढवणे हा पर्याय ठरू शकतो. रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रेल्वेला जर एक क्रियाशील संघटनेसारखे चालवायचे असेल तर, रिकाम्या रेल्वे गाड्या बंद करण्यात याव्यात.