अयोध्या निकाल: न्यायमूर्तींनी बोलावली महत्त्वाची बैठक

आज दुपारी १२ वाजता सर्वोच्च न्यायालयात बैठक

Updated: Nov 8, 2019, 11:36 AM IST
अयोध्या निकाल: न्यायमूर्तींनी बोलावली महत्त्वाची बैठक title=

नवी दिल्ली : अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमिनीचा निकाल आता कोणत्याही क्षणी लागू शकतो. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांना सरन्यायाधीशांनी बैठकीसाठी बोलावलं आहे. आज दुपारी १२ वाजता सर्वोच्च न्यायालयात ही बैठक होणार आहे.

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयानं सर्वच महत्त्वाच्या राज्यांना एक पत्र पाठावलं आहे. यामध्ये राज्यातील सुरक्षा वाढवण्यास सांगितलं आहे. गरज असेल तर संवेदलशील ठिकाणी अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

अयोध्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून उपाययोजना सुरु झाल्या आहेत. अयोध्या प्रकरणाचा निकाल हा ५ दिवसांमध्ये कधीही येऊ शकतो. शनिवार आणि रविवार न्यायालयाचं कामकाज बंद असेल. यानंतर मंगळवारी १२ तारखेला गुरु नानक जयंती मुळेही न्यायालयाला सुट्टी असेल. १८ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारपासून शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदाची सूत्र स्वीकारणार आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कार्यकाळात ८ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर, १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबर या ५ दिवसांमध्येच न्यायालयाचं कामकाज सुरु असेल, त्यामुळे या ५ दिवसांमध्येच अयोध्या खटल्याचा निकाल येईल.