कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, 'जम्मू-काश्मीरमध्ये...'

India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा कॅनडीयन संसदेमध्ये उपस्थित केल्याने सुरु झालेला हा वाद आता थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 20, 2023, 09:13 AM IST
कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, 'जम्मू-काश्मीरमध्ये...' title=
भारताने राजदूतांना 5 दिवसांमध्ये देश सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर कॅनडाने जारी केलं पत्रक

India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत आपल्या नागरिकांसाठी एक पत्रक जारी केलं आहे. कॅनडाने या पत्रकामध्ये आपल्या देशातील नागरिकांना जम्मू-काश्मीरसंदर्भात निर्देश दिले आहेत.

कॅनडा भारत वाद कशावरुन?

सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडीयन संसदेमध्ये भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. त्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कॅनडामधून भारतात परत पाठवलं. यानंतर भारताने मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून कॅनडाच्या भारतातील राजदुतांबरोबर एक बैठक घेतली. या बैठकीनंतर भारताने कॅनडाच्या राजदूतांना 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले. यानंतर कॅनडाने थेट जम्मू-काश्मीरचा मुद्दा एका पत्रातून उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> 'त्या' Insta स्टोरीमुळे विराटने आवडत्या गायकाला केलं Unfollow; भाजपाकडून FIR ची मागणी

कॅनडाने काय निर्देश दिलेत?

कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भातील पत्रच कॅनडा सरकारने जारी केलं आहे. कॅनडा सरकारने सुरक्षेसंदर्भातील कारणांचा संदर्भ देत कॅनडाच्या नागरिकांना जम्मू-काश्मीरचा दौरा टाळण्याचा सल्ला दिला आहे. 'जम्मू-काश्मीरला जाऊ नका कारण त्या ठिकाणी दहशतवाद, हिंसाचार, नागरिकांमध्ये अशांतता आणि अपहरण होण्याची धोका आहे,' असं कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांना दिलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे. तसेच हा निर्देश केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखसाठीही लागू आहेत, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. 

भारताने नोंदवली प्रतिक्रीया

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले आहेत. "भारत कॅनडाचे सर्व आरोप फेटाळत आहे. आम्ही त्यांच्या संसदेमध्ये कॅनडीयन पंतप्रधानांनी केलेलं विधान ऐकलं. आम्ही त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांचं विधानही फेटाळून लावत आहोत. कॅनडामधील हिंसाचाराच्या कोणत्याही कृत्यामध्ये भारत सरकारचा समावेश नाही. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत," असं भारताने म्हटलं आहे. आमचा देश हा कायद्याचं पालन करणारा लोकशाहीच्या नियमांनुसार राजकारण करणारा देश असल्याचंही भारताने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार 'महागात'

3 महिन्यांपूर्वी झालेली हत्या

18 जून रोजी कॅनडामधील सुरे येथे हरदीप सिंग निज्जरची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर कॅनडामधील सिख फॉर जस्टिस आणि खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवादी असलेल्या निज्जरवर 10 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. याच मुद्द्यावरुन कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या हत्येमध्ये भारताचा सहभाग होता असा कॅनडीयन पंतप्रधानांनी आरोप केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असून भारताने ते फेटाळले आहेत. या प्रकरणावरुन दोन्ही देशांमधील संबंध आणखीन ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.