Budget 2019: मोदी सरकारच्या 5 मोठ्या घोषणा

यंदाच्या बजेटमध्ये मोदी सरकारने सगळ्याच वर्गासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Updated: Feb 1, 2019, 03:16 PM IST
Budget 2019: मोदी सरकारच्या 5 मोठ्या घोषणा title=

बजेट 2019, नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत अंतरिम बजेट सादर केला.  करण्यास सुरुवात केली आहे. बजेटच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हटलं की, आम्ही 2022 पर्यंत नवा भारत बनवू. या दरम्यान त्यांनी अनेक मोठ्या नव्या घोषणा केल्या. शेतकरी, मध्यम वर्ग, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. मोदी सरकारने या बजेटमधून अनेक सिक्सर लगावल्याचं मत अनेकांनी नोंदवलं आहे. जाणून घ्या यंदाच्या बजेटमधल्या 5 मोठ्या घोषणा.

1. इनकम टॅक्सबाबत ऐतिहासिक सूट

नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आणि सर्वसामान्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने इनकम टॅक्समध्ये मोठी सूट दिली आहे. आता 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताच टॅक्स लागणार नाही. स्टँडर्ड डिडक्शनला 40 हजार वरुन 50 हजार रुपये करण्यात आला आहे. ही आजच्या बजेटमधली सर्वात मोठी घोषणा मानली जात आहे. पहिल्यांदाच इतिहासात इतकी मोठी टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे.

किती टॅक्स लागणार?

2. श्रम योगी मानधन मेगा पेंशन योजना

मेगा पेंशन योजनेच्या माध्यमातून 60 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेंशन म्हणून मिळणार आहे. या योजनेसाठी दर महिन्याला तुम्हाला 55 रुपये द्यावे लागणार आहेत. या योजनेचा फायदा रिक्षा चालवणाऱ्या आणि कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला देखील मिळणार आहे. पेंशन योजनेसाठी सरकारने 500 कोटींची तरतूद केली आहे. पेंशन योजनेचा फायदा 10 कोटी लोकांना होणार आहे. पेंशन योजनेची सुरुवात याच वर्षापासून केली जाणार आहे.

3. शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी योजना

यासोबतच पीयूष गोयल यांनी या बजेटमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेची देखील घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला 6 हजार रुपये वर्षाला मदत म्हणून दिले जाणार आहे. पीएम शेतकरी सन्मान योजनेसाठी सरकारने 75,000 कोटींची तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना 1 डिसेंबर 2019 पासून मिळणं सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा पहिला हप्ता लवकरच दिला जाणार आहे. योजनेतून वर्षाला 3 वेळ 2-2 हजार रुपये दिले जातील.

4. संरक्षणासाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं बजेट

यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संरक्षण बजेटमध्ये मोठी घोषणा केली आहे. 3 लाख कोटीपेक्षा अधिकच बजेट यासाठी ठेवण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतकं मोठं बजेट संरक्षणासाठी देण्यात आलं आहे. अर्थमंत्री यांनी म्हटलं की, 'आम्ही दहशतवाद मुक्त सरकार चालवली आहे.' 

5. आता 24 तासात इनकम टॅक्स रिफंड 

अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं मागील 5 वर्षात देशात टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 80% वाढली आहे. 2014 मध्ये 6.38 लाख कोटी रुपये टॅक्स जमा झाला होता. जो आज 12 लाख कोटींनी वाढला आहे. यंदा 6.85 कोटी इनकम टॅक्स रिटर्न फाईल आले आहेत. 99.54% इनकम टॅक्स रिटर्नल लगेचच मंजूर करण्यात आले. आता टॅक्स मुल्यांकनासाठी इनकम टॅक्स ऑफिसमध्य़े जाण्याची देखील गरज नाही. पीयूष गोयल यांनी म्हटलं की, आता 24 तासात सगळ्या इनकम टॅक्स रिटर्न प्रोसेस होणार आहे आणि लगेचच रिफंड केले जाणार आहे.