"कॉंग्रेसमुळे मला चार मुले झाली"; भाजप खासदार रवि किशन यांची मुक्ताफळे

Ravi Kishan : भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन यांनी देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

Updated: Dec 10, 2022, 09:39 AM IST
"कॉंग्रेसमुळे मला चार मुले झाली"; भाजप खासदार रवि किशन यांची मुक्ताफळे title=
(फोटो सौजन्य - PTI)

Ravi Kishan : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपकडून सातत्याने कॉंग्रेसवर (Congress) टीका केली जात असते. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसमुळे देशाची प्रगती झाली नाही अशी टीका भाजप नेत्यांकडून केली जाते. अशातच भाजप खासदार रवि किशन यांनी वाढत्या लोकसंख्येसाठी कॉंग्रेसलाच दोषी ठरवले आहे. काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक (Population Control Bill) आणले असते तर आज मी चार मुलांचा बाप झालो न सतो. याला काँग्रेस जबाबदार आहे, असे रवि किशन यांनी शुक्रवारी  म्हटले आहे. काँग्रेस सरकारमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही, त्यामुळे आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागले आहे, असेही रवि किशन म्हणाले.

तुम्हालाच चार मुले आहेत त्याचं काय?

देशातील वाढती लोकसंख्या सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच याच गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी शुक्रवारी लोकसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी खासगी विधेयक मांडले. त्याआधी आज तकच्या एका कार्यक्रमात बोलताना रवि किशन यांनी याबाबत भाष्य केले होते. यावेळई तुम्ही लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणत आहात, सोशल मीडियावर तुम्हालाच चार मुले आहेत त्याचं काय? असा प्रश्न विचारला जातोय. यावर तुम्ही काय सांगाल?, असे विचारण्यात आले.

काय म्हणाले रवि किशन?

"मला चार मुले आहेत, ही माझी चूक नाही. काँग्रेस सरकारने त्यावेळी विधेयक आणले असते आणि कायदा असता तर मला चार अपत्ये झाली नसती. आधीच्या सरकारने या बाबतीत सावधगिरी बाळगायला हवी होती. लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा केला असता तर चार मुले झाली नसती. काँग्रेस सरकारमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही, त्यामुळे आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागले आहे, असे उत्तर रवि किशन यांनी दिले आहे.

चार मुलं झाल्याचा पश्चाताप - रवि किशन

"आता तो लोकसंख्या नियंत्रणाचा विचार करतो तेव्हा मला चार मुले झाल्याचा पश्चाताप होतो. चीनने वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले आहे. आपल्या देशातील आधीच्या राज्यकर्त्यांनी विचार केला असता तर येणाऱ्या पिढ्यांना असा संघर्ष करावा लागला नसता," असेही रवि किशन म्हणाले.