गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

Jayant Sinha Retired From Active Politics : गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Mar 2, 2024, 05:54 PM IST
गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती title=
Jayant Sinha Retired , Hazaribagh, Gautam gambhir

Jayant Sinha Retired : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौतमने क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्ती घेतल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी (LokSabha Elections 2024) भाजपला मोठे धक्के बसताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. गौतम गंभीर प्रमाणे सोशल मीडियावर पोस्ट करत जयंत सिन्हा यांनी निवृत्तीची (Jayant Sinha Retired From Active Politics) घोषणा केली.

काय म्हणाले जयंत सिन्हा?

मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना विनंती करतो की, मला माझ्या थेट निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावं, जेणेकरुन मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलाशी लढण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेन. अर्थात, आर्थिक आणि प्रशासनाच्या मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहीन, असं म्हणत जयंत सिन्हा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून मला भारत आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. याशिवाय, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अनेक संधींचा मला आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे मी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार, असं म्हणत जयंत सिन्हा यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, जयंत सिन्हा हे माजी केंद्रीय मंत्री आणि टीएमसी नेते यशवंत सिन्हा यांचे सुपुत्र आहेत. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्री करण्यात आले होते. जयंत सिन्हा हे 2016 ते 2019 दरम्यान हवाई वाहतूक राज्यमंत्री होते. याशिवाय त्यांनी 2014 ते 2016 दरम्यान अर्थ राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. तर 2019 मध्ये जयंत सिन्हा पुन्हा हजारीबागमधून विजयी झाले होते. मात्र, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना मंत्रीपद देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा देखील झाली होती.