या मराठमोळ्या व्यक्तीने बनवला नव्या संसद भवनावर बसवण्यात आलेल्या हा विशाल अशोकस्तंभ

नव्या संसद भवनावर बसवण्यात आलेल्या अशोकस्तभांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पाहा कोणी बनवलाय हा अशोकस्तंभ.

Updated: Jul 12, 2022, 09:17 PM IST
या मराठमोळ्या व्यक्तीने बनवला नव्या संसद भवनावर बसवण्यात आलेल्या हा विशाल अशोकस्तंभ title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभचे अनावरण केले. ते तयार करण्यासाठी 100 हून अधिक कामगार आणि 9 महिन्यांहून अधिक कालावधी लागला. उच्च शुद्धतेच्या कांस्यांपासून बनवलेले भारताचे राष्ट्रीय चिन्ह स्थापित करणे हे एक आव्हान होते कारण ते जमिनीपासून 33 मीटर उंच आहे. या सगळ्या दरम्यान, या राष्ट्रचिन्हाच्या रचनेमागे एका मराठी व्यक्तीचा हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हा एवढा सुंदर अशोकस्तंभ बनवण्यामागे कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

महाराष्ट्रातील औरंगाबादचे सुनील देवरे आणि जयपूरचे लक्ष्मण यांनी हे डिझाईन केले आहे. राष्ट्रीय चिन्ह तयार करणारे 49 वर्षीय शिल्पकार सुनील देवरे यांना जेजे स्कूल ऑफ आर्ट्सकडून सुवर्णपदक मिळाले आहे. त्याचे वडीलही याच महाविद्यालयातून शिकले. इतकंच नाही तर सुनील यांनी अजंता एलोरा व्हिजिटर सेंटरमध्ये अजिंठा एलोरा लेण्यांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत, ज्याची किंमत 125 कोटी आहे. मूळ अजिंठा एलोरा लेण्यांवरील दबाव कमी करणे हा या प्रतिकृती बनवण्यामागचा उद्देश होता.

सुनील देवरे आणि अशोक स्तंभाची कथा

हे बहुमोल काम करण्यासाठी माझी देशभरातून निवड झाली, यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो, असे सुनील देवरे यांनी म्हटले आहे. त्यांना ही प्रेरणा त्यांच्या वडिलांकडून मिळाली. जे स्वतः पुरातत्व विभागाच्या जीर्णोद्धार विभागात काम करतात. अशोक स्तंभाच्या निर्मितीमागील कथा सांगताना देवरे म्हणाले की, अशोक स्तंभ बनवण्यासाठी आम्हाला टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे ​​सहकार्य मिळाले. टाटा प्रोजेक्ट्सने गेल्या वर्षी यासंदर्भात सर्वेक्षणही केले होते. सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी माझ्या अनुभवांच्या आधारे माझी निवड केली.

शिल्पकार सुनील देवरे यांनी सांगितले की, राष्ट्रचिन्हं तयार करण्यासाठी त्यांना सुमारे 5 महिने लागले. यानंतर सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांशी संबंधित तज्ञांकडून त्याचे मूल्यमापन करण्यात आले आणि त्यानंतर ते पुढील विचारार्थ पारित करण्यात आले. देवरे पुढे म्हणाले की, पास झाल्यानंतर मी या पिलरचे फायबर मॉडेल बनवले. मी या मॉडेलसह जयपूरला गेलो होतो जिथे ते कास्यामध्ये बनवण्यात आले.

अशोकस्तंभाची उंची 21 फूट आहे. या राष्ट्रीय चिन्हाचे वजन 9,500 किलो आहे. हे प्रतीक उच्च दर्जाच्या कांस्यांपासून बनवलेले आहे आणि ते पूर्णपणे भारतीय कारागिरांनी हाताने बनवले आहे. ते म्हणाले, “भारतात इतर कोठेही साहित्य आणि कारागिरीच्या दृष्टिकोनातून असे चिन्ह बनवले गेलेले नाही.