भाजपला धक्का, एकाच वेळी ८ आमदारांचा पक्षाला रामराम

या कारणामुळे उचलावं लागलं पाऊल 

Updated: Mar 20, 2019, 11:57 AM IST
भाजपला धक्का, एकाच वेळी ८ आमदारांचा पक्षाला रामराम  title=

इटानगर : संपूर्ण देशात एकिकडे निवडणुकांच्या रणांगणात पक्ष मोठ्या ताकदीने उतरत असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच अरुणाचल प्रदेश येथे दोन मंत्री आणि ६ आमदारांनी पक्षाला रामराम केला आहे. भाजपतून बाहेर पडत या नेतेमंडळींनी नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांची उमेदवारी न दिल्यामुळे नाराज आमदारांनी ही बाहेरची वाट धरल्याचं स्पष्ट होत आहे. ही परिस्थिती आणि पक्षांतर करणारे नेतेमंडळी पाहता ८ आमदार आणि त्यांच्यासह एकूण १२ पदाधिकारी अशा एकूण २० जणांनी 'एनपीपी'त प्रवेश केला आहे.

राज्य सचिव जरपूरम गॅमलिन, राज्याचे गृहमंत्री कुमार वै, पर्यटन मंत्री जरकार गॅमलिन आणि इतर आमदारांनी उमेदवारी न दिल्याबद्दलची नाराजी व्यक्त करत एनपीपीची वाट धरली. भाजपच्या संसदीय समितीने रविवारी ६० सदस्यसंख्या असणाऱ्या विधानसभेसाठी ५४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. अरुणाचल प्रदेश येथे विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकाच दिवशी म्हणजे ११ एप्रिलला पार पडणार आहेत. 

भाजप एक योग्य पक्ष असता तर.... 

ऐन निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या कुमार वै यांनी यावेळी भाजपविषयीची नाराजी उघडपणे मांडली. भाजप हा एक योग्य पक्ष असता तर, मी त्याच पक्षासाठी कार्यरत राहिलो असतो. भाजपमध्ये अनुक्रमे देश, पक्ष आणि मग व्यक्ती अशा गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. पण, सध्याच्या घडीला इथे हुकुमशाहीचं राजकारण सुरू आहे. आमचं राज्य हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, ही महत्त्वाची बाब मांडत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली.

नव्या नेत्यांचं NPP कडून स्वागत

नॅशनल पीपल्स पार्टीचे राष्ट्रीय सचिव थॉमस संगमा यांनी पक्षात आलेल्या नव्या सद्यांचं स्वागत केलं. भाजपमधून NPP मध्ये आलेल्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपची विचारसरणी ही योग्य नसल्याचं म्हणत आपला पक्ष हा कोणाशीच युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.